उशिरा तुटणाऱ्या उसाला जादा दराची परंपरा खंडित

उशिरा तुटणाऱ्या उसाला जादा दराची परंपरा खंडित

कोल्हापूर ः गेल्या काही वर्षात यंदा पहिल्यांदाच साखर हंगामाचा शेवट सुना सुना होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक वर्षी साखर कारखाने जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी फेब्रुवारीपासून हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसास जादा दराची घोषणा करतात. परंतु यंदा असे कुठेच चित्र दिसले नाही. साखरेला दर नसल्याने कारखान्यांनी हात आखडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

अनेक कारखान्यांनी अगदी साधेपणाने गळीत हंगामाची सांगता केली आहे. शिल्लक उसाची तोडणीच आवरत नसल्याने नामवंत कारखान्यांनीही जादा दर देवून ऊस उत्पादकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यंदाच्या हंगामात सोडून दिला आहे. हंगाम संपण्यास बोटावर मोजण्याइतकेच दिवस उरल्याने आता उशिरा गाळप होणाऱ्या उसास जादा दर मिळण्याची शक्‍यता धूसर असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. 

कारखान्यांमध्ये स्पर्धा नाही  दरवर्षी जिल्ह्यातील मातब्बर कारखान्यांमध्ये ऊस गाळपासाठी स्पर्धा लागते. चांगला दर देण्यासाठी प्रसिद्ध कारखान्यांकडून उशिरा तुटणाऱ्या उसास जादा दर देण्याची घोषणा होत असते. साधारणत: फेब्रुवारी उजाडला की कारखाने जाहीर केलेल्या उसापेक्षा मार्चमध्ये तुटलेल्या उसास टनास शंभर रुपयांच्या आसपास जादा दर देण्याची घोषणा करतात. जेणेकरून शेवटच्या टप्प्यातील ऊस कारखान्याला येऊन शेवटच्या दिवसापर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालावेत, अशी अपेक्षा कारखानदारांची असते. 

यंदा सुरवातीपासूनच मरगळ  यंदा हंगाम सुरू झाल्यापासूनच कारखान्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. साखरेचे दर कमालीचे घसरल्याने त्याचा दबाव कारखानदारांवर होता. यातच राज्य बॅंकेनेही मूल्यांकनात घट केल्याने जाहीर केलेला पहिला हप्ता देण्यासाठीही कारखानदारांना कसरत करावी लागली. हंगामाच्या मध्यावर साखरेचे दर कोसळलेले असताना यंदा पहिल्यांदाच जाहीर केलेल्या दरात पाचशे रुपयांची कपात करण्याची घोषणा करण्याची नामुष्की कारखान्यांवर आली. या चक्रातून कारखाने सावरलेच नाहीत. लाखो रुपयांची देणी कायम ठेवूनच अनेक कारखाने बंद झाल्याची स्थिती आहे. यामुळे उशिराच्या  उसास जादा दर देण्याचा विचारही कोणी केली नाही

निर्णयाला विलंब झाल्याने नाराजी  केंद्र व राज्य शासनाने हंगाम सुरू असताना अनेक निर्णय जाहीर केले. पण अपवाद वगळता यातून ठोस काहीच निर्माण झाले नसल्याने कारखानदारांतून मोठी नाराजीची भावना दिसून येत आहे. साखरेचे दरच स्थिर राहात नसल्याने साखर विक्रीच्या निविदा काढणे, त्याची विक्री करणे आणि त्यातून बॅंकेचे कर्ज व शेतकऱ्यांचा हप्ता भागविणे या गोष्टी करताना मोठी अडचण निर्माण झाल्याचे एका कारखाना प्रतिनिधीने सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com