अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे वऱ्हाडातील तीन जिल्हे मिळून २६३ कोटींचे चुकारे दीड महिन्यापासून थकलेले अाहेत. थकलेले हे चुकारे या अाठवड्यात मार्गी लागतील असे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाने २१ जुलै ते २१ अाॅगस्ट या काळात मे महिन्यात टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली. वऱ्हाडात सुमारे पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर या काळात मोजली गेली अाहे. या तुरीचे मिळून २६३ कोटींचे चुकारे थकलेले अाहेत. हे चुकारे कधी मिळतील याबाबत शेतकऱ्यांमधून वारंवार विचारणा केली जात अाहे.
प्रामुख्याने थकलेल्या चुकाऱ्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्याचे सर्वाधिक १०१ कोटी ७४ लाख रुपये अाहेत. वाशीम जिल्ह्याचे ८४ कोटी ९५ अाणि अकोला जिल्ह्याचे ७८ कोटी ९६ लाख रुपये अाहेत. हजारो शेतकऱ्यांनी विकलेल्या या तुरीचे हे चुकारे मिळावेत, यासाठी शेतकरी तालुका कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत अाहेत.
खरेदी केलेल्या तुरीचे मोजमाप, साठवणूक करण्यात यंत्रणांचा वेळ गेला. खरेदी केलेल्या तुरीच्या माहितीची जुळवाजुळव झाल्यानंतर चुकाऱ्यांची माहिती गोळा झाली. त्यानुसार तीनही जिल्ह्यांसाठी सुमारे २६३ कोटींचे चुकारे शासनाकडून मिळायचे अाहेत.
राज्य शासनाने ६३८ कोटींचा निधी मंजूर केला असून, त्याचे वितरण लवकरच सुरू होत अाहे. त्यामुळे येत्या अाठ दिवसांत वऱ्हाडातील शेतकऱ्यांचे चुकारे होतील अशी अपेक्षा नाफेडच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दसऱ्यापूर्वी ही रक्कम जमा झालेली असेल, असा अाशावादही या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
खरीप पिकांनी याही वर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याने अागामी रब्बी हंगामात बियाणे, खते, मशागतीसाठी पैशांची गरज अाहे. बँकांकडून या हंगामात पीककर्ज मिळालेले नाही. शिवाय अाता रब्बीसाठीही कर्ज मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुरीची विक्री करून येणाऱ्या पैशात रब्बीसाठी पैशांची तजवीज होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा अाहे. त्यामुळे हे पैसे मिळण्याची सातत्याने मागणी केली जात अाहे.