सातारा जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी सव्वादोन लाखांवर अर्ज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी सातारा जिल्ह्यातून दोन लाख ४० हजार ७४७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. 

या अर्जांचे गावनिहाय चावडी वाचन करण्यात येणार आहे. त्या वेळी सबळ पुराव्यांसह एखाद्या शेतकऱ्यांच्या नावाविषयी आक्षेप घेतला गेल्यास संबंधितांचा अर्ज बाद ठरणार आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अंतिम यादी तयार होण्याची शक्‍यता आहे. 

कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी (ता. २२) संपली. दाखल अर्जांच्या छाननीनंतर बॅंकांसह विविध विकास सेवा सोसायट्यांकडून माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. अर्जांची पडताळणी केली जात आहे. या पडताळणीतून गावनिहाय यादी तयार करून चावडी वाचन होईल. 

जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी दोन लाख ४० हजार ७४७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. या अर्जांची सर्व प्रकारे तपासणी झाल्यानंतरच अंतिम यादी साधारण दहा ऑक्‍टोबरपर्यंत तयार होईल. त्यानंतर कर्जमाफीस पात्र ठरलेल्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात नियमित कर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या कर्जमाफीचा लाभ खूप कमी शेतकऱ्यांना मिळणार आहे. अवाजवी निकषामुळे या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे अडचण जिल्ह्यात १६ ऑक्‍टोबरला ३१९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यातच कर्जमाफीच्या अर्जाचे वाचन करावे लागणार असल्याने ही प्रक्रिया अडचणीची ठरणार आहे. तसेच कर्जमाफीच्या अर्जाचे राजकारण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com