सांगली जिल्ह्यातील गावे आज बंद

सांगली जिल्ह्यातील गावे आज बंद
सांगली जिल्ह्यातील गावे आज बंद

सांगली  ः आमच्या जमिनी गेल्या आहेत, चांदोली धरण बांधतेवेळी त्या परिसरातील गावांचे आमच्या भागात पुनर्वसन झाले आहे, आम्हालाच अजून पाणी मिळत नाही, तसेच पुनर्वसन झालेल्या गांवानादेखील पाणी मिळत नाही, मग आम्ही वारणेचे पाणी इचलकरंजीला का द्यायचे? असा प्रश्‍न उपस्थित करून सांगली जिल्ह्यातील वारणा पट्ट्यात पाण्यासाठी लढाई सुरू झाली आहे. 

दानोळी (जि. कोल्हापूर) येथे याप्रश्‍नी आंदोलन सुरू आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. सांगली जिल्ह्यातील वारणाकाठची गावे गुरुवारी (ता. १७) बंद पाळणार असून, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा वारणाकाठच्या गावांनी दिला.

राज्य शासनाने वारणेचे पाणी इचलकरंजी व परिसरातील गावे, तसेच औद्योगिक प्रकल्पांना देण्यासाठी अमृत योजना मंजूर केली आहे. योजनेमुळे वारणाकाठच्या ६० ते ७० गावांना व त्या अंतर्गत पाणी पुरवठा संस्था, खासगी शेती पंपधारक यांना पाणी कमी पडण्याचा धोका आहे. त्यामुळे योजनेला विरोध सुरू आहे. 

योजनेला विरोध म्हणून कोरेगाव, ढवळी, शिगाव, बागणी, काकाचीवाडी, फार्णेवाडीतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १७) ही गावे बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मुळात चांदोली धरणासाठी आमच्या जमिनी अधिग्रहीत केल्या आहेत. त्याचप्रमाणे चांदोली धरण बांधण्यात आले त्यावेळी या भागातील वसाहतींचे स्थलांतर करण्यात आले. या वसाहती आमच्या परिसरातमध्ये पुनर्वसित केल्या आहेत. त्यामुळे आम्हालाच पाणी मिळत नाही, असे अनेक ग्रामपंचायतींचे ठराव शासनाच्या दरबारी पाठविले आहेत.

वारणा योजनेच्या विरोधात  हातकणंगले बंद

इचलकरंजीला वारणा नदीतून पाणी देणार नाही ही भूमिका घेऊन वारणा नदीकाठच्या गावांनी पुकारलेल्या बंदचा सिलसिला बुधवारी (ता.१६) सुरूच राहिला. बुधवारी हातकणंगले गावात या प्रश्‍नी बंद पाळून दानोळी ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. ही योजना कोणत्याही परिस्थितीत करणारच या निर्धाराने इचलकरंजी शहरातही दोन दिवसांपूर्वी बंद पाळला होता. आता शहरात प्रभागवार लाक्षणिक उपोषण करून हा प्रश्‍न तापवत ठेवला जात आहे. याउलट ही योजना करू देणार नाही, असे वारणा काठच्या ग्रामस्थांचे म्हणणे कायम आहे. इचलकरंजीचा बंद झाल्यानंतर पुन्हा नव्याने या गावांनी एकत्र येऊन ताकद दाखविण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. या अंतर्गत गावागावांतील नेतेमंडळी एकमेकांना भेटून मते आजमावून घेत आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटून गावच्या समस्या सांगण्यासाठी गावातील नेत्यांनी भेट सत्र सुरू केले आहे. यामुळे या प्रश्‍नाचे गांभीर्य वाढत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com