राज्यातील तेरा जिल्ह्यांत ३९१ टँकरने पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गावागावांत पाणीटंचाई वाढू लागली आहे. सध्या राज्यातील तेरा जिल्ह्यांतील ४०१ गावे व दहा वाड्यांना ३९१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे भूजलपातळीत चांगली वाढ झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होण्याची शक्यता होती. मात्र, काही ठिकाणी कमी पाऊस आणि अधिक पाण्याचा उपसा यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढल्याने पाणीटंचाईची समस्या गावात व वाड्या-वस्त्यावर वाढू लागली आहे.  नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या नागपूर व ठाणे विभागात पाणीटंचाई नसली, तरी उर्वरित भागात पाणीटंचाईस सुरवात झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात १६४ गावे २१३ वाड्यांवर १५४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते.  मराठवाड्यातही पाणीटंचाईने तीव्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. मराठवाड्यातील २०५ गावे ८ वाड्यांवर २५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील १६९ गावांमध्ये २०६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालन्यातील सोळा गावांमध्ये २०, परभणीतील सहा गावे व एका वाडीवर आठ, हिंगोलीतील दोन गावांत एक टँकर, नांदेडमधील बारा गावे सात वाड्यांवर सतरा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत पाण्याची स्थिती अजूनही चांगली आहे.  विदर्भातील अमरावती विभागात गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. अकोला जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये ४६ टँकर, वाशीमधील सात गावात सात टँकर, बुलडाण्यातील बारा गावांत बारा टँकर, यवतमाळमध्ये वीस गावांमध्ये वीस टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज असून, भूगर्भातील पाण्याचा कमी उपसा करण्याची गरज आहे .   मध्य महाराष्ट्रात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांशी धरणे भरून भूजलपातळीत वाढ झाली होती. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाई सुरू झाली आहे. पुणे विभागातील साताऱ्यांतील प्रत्येकी एका गावात व वाडीवर गेल्या महिन्यापासून एका टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील सोळा गावे व एका वाडीला नऊ टँकर, धुळे जिल्ह्यांतील दहा गावांमध्ये नऊ टँकरने, जळगावमधील ७१ गावांमध्ये ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

विभागनिहाय सुरू झालेले टँकर विभाग             गेल्या वर्षीची टँकर संख्या    यंदाची टँकर संख्या  कोकण                           १२                               - नाशिक                          १४                              ५३  पुणे                               ४०                               १  औरंगाबाद                      ८८                              २५२ अमरावती                        -                               ८५      एकूण                             १५४                             ३९१   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com