पंचनाम्यांसाठी शेतकऱ्यांच्या हाती पाट्या देणे ही काय पद्धत?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गारपिटीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या हातात पाटी देण्यात आली. ही पंचनाम्याची पद्धत आहे का, असा संतप्त सवाल सरकारला मंगळवारी (ता.६) राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. शेतकऱ्यांशी असा व्यवहार होणार असेल, तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे, हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. गारपिटीचे पंचनामे करताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे हातात पाट्या घेऊन फोटो काढण्यात आले होते. या संदर्भात ॲग्रोवनमध्ये सर्वप्रथम वृत्त देण्यात आले होते. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला वारंवार सांगूनही सरकार काहीच करत नसून ते कोडगे बनले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणीही पाटील यांनी या वेळी केली. विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने गारपीट, बोंड अळीच्या प्रश्नावर चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेत सहभागी होताना जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. 

राज्याचे कृषी खाते बेजबाबदारपणे काम करत असून, हा कृषी खात्याचा अकार्यक्षम कारभाराचा नमुना आहे, अशी टीका पाटील यांनी केली. देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने आयातीवर निर्बंध घालण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. तरीही आयात वाढत चालली आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. तुरीला कवडीमोल भाव दिला जात आहे. गारपिटीने शेतकऱ्यांना झोडपले असताना सरकार मदत करायला तयार नाही, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, गारपिटीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या हातात पाटी देण्यात आली. यारून सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे हे दिसून येते, असेही पाटील म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com