शेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत का

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यामुळे पीककर्ज वाटप ठप्प झालेले आहे. पेरणीचा काळ जवळ आला असून, आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशा स्थितीत त्याने आपल्या शेतात भाजपचे झेंडे लावावेत का, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

आसूड यात्रेनिमित्त ते खामगाव येथे बोलत होते. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, निराधार व बेरोजगारांच्या हक्कासाठी आमदार कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते मराठवाड्यातील भोकरदनपर्यंत आसूड यात्रा काढली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन गावापर्यंत ही आसूड यात्रा प्रहार संघटनेने आयोजित केली आहे. शुक्रवारी (ता. २५) ही यात्रा खामगावमध्ये दाखल झाली. 

आमदार कडू म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना त्यांनी स्वामिनाथन आयोग लागू केला नाही. आता तेच हल्लाबोल करीत आहेत. काँग्रेसने हल्लाबोल यात्रेदम्यान शेतकऱ्यांची जाहीर माफी मागायला हवी होती; परंतु त्यांनी तसे केले नाही. सत्तेत येण्यापूर्वी भाजपचे नेते आमचा एक सैनिक शहीद झाल्यास त्यांचे दोन मारू अशी भाषा करीत होते; परंतु आता आमच्या शेतकऱ्यांच्या जिवावर उठून पाकिस्तानची साखर भाजपने आयात केली आहे. शेतमालाला भाव देण्याऐवजी परदेशातून शेतमाल आयात करण्याचे धोरण हे सरकार राबवित आहे. 

कृषिमंत्र्यांच्या बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना गारपीट, बोंड अळीसह इतर नुकसानभरपाई अद्यापही मिळालेली नाही. पेरणीआधी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यास कृषिमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून आंदोलन करू, असा इशारा आमदार कडू यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com