साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा ः अजित पवार

साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा ः अजित पवार
साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा ः अजित पवार

लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. साखरचे भाव सहाशे रुपयांनी उतरूनदेखील सरकार हस्तक्षेप करायला तयार नाही. ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आणखी बिघडणार आहे. साखर कारखाने चालू झाले नाही तर भरपाई देऊन सरकार बुडून जाईल, अशी भीती व्यक्त करून यात शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली हल्लाबोल यात्रा शुक्रवारी (ता. १९) लातूर जिल्ह्यात आली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, आमदार विक्रम काळे, आमदार विद्या चव्हाण, चित्रा वाघ, आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे आदी उपस्थित होते. ‘‘शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्यांकडे वळत आहेत. कर्जमाफी व्यवस्थितीत दिली गेली नाही, वीज जोडणी देण्याअगोदरच वीजबिले दिली जात आहेत. तेलंगणात मोफत चोवीस तास वीज दिली जाते, पण येथे माफक दरात आठ ताससुद्धा वीज मिळत नाही. ज्यांनी कर्ज फेडले त्यांना प्रोत्साहनाचे २५ हजार रुपये दिले जात नाहीत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, बेरोजगारी वाढत आहे, शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. राज्यात काय चाललेय, हेच कळत नाही. काही विचारले की, अभ्यास सुरू आहे, असे सांगितले जाते. सध्या हे शासन केवळ जाहिरातबाजीत मश्गूल आहे,’’ अशी टीका श्री. पवार यांनी केली.  ते पुढे म्हणाले, की आमच्या शासनातदेखील साखरेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तातडीने क्विंटलला शंभर रुपये निर्यात अनुदान दिले होते. आता सहाशे रुपयांनी साखरेचे दर कमी झाले आहेत. त्याचा परिणाम साखर उद्योगावर होणार आहे. पण शासन हस्तक्षेप करायला तयार नाही. पुढच्या वर्षीतर वाढत्या ऊसामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारखाने सुरूच होतात की नाही याची भीती आहे. अशा वेळी नुकसान भरपाई देऊन सरकार बुडून जाईल. त्यामुळे आता लक्ष देण्याची गरज आहे.  ‘‘मराठवाड्यात सतत दोन तीन वर्ष दुष्काळ होता. त्याची महावितरणकडून मोठ्या प्रमाणात बिले दिली जात आहेत. येथील शेतकऱ्यांना कृषी संजीवनी योजनेचा लाभ देण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप देऊन विजेवर मात करण्याची गरज आहे,’’ असेही श्री. पवार म्हणाले.  एकंबी (ता. औसा) येथील शहाजी राठोड या शेतकऱ्याने जास्तीचे वीजबिल आल्याने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. पाच, सहा लाख खर्च येणार आहे. पक्षाच्या वतीने त्यांना तातडीची एक लाखाची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी यावेळी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com