दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला वगळले

दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला वगळले
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला वगळले

नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात प्रचंड विषमता आहे. त्यामुळे हा तालुका दुष्काळी घोषित करावा. केंद्र शासन दुष्काळ व्यवस्थापनाने संहिता व निकष विचारात घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांत टंचाई लागू झालेली आहे. पर्जन्यमानाची स्थिती तालुकानिहाय घेतल्याने अकोले तालुक्‍याचा त्यात समावेश नाही. मात्र, अकोल्यात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, तरीही सरकार निकष लावण्याच्या नावाखाली अकोले तालुक्‍यावर सरकार अन्याय करीत आहे, असे आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.

आमदार पिचड यांनी अकोले तालुक्‍यातील परिस्थितीबाबत ‘ॲग्रोवन’शी बोलताना ते म्हणाले, की दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ व निकष विचारात घेऊन जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांमध्ये टंचाई लागू झालेली आहे. यात अकोले तालुक्‍याचा समावेश नाही. मात्र, अकोल्याची परिस्थिती कोणी विचारातच घेत नाही. सुरवातीला जोरात पाऊस पडला, पण आता दीड महिन्यापासून पाऊस गायब असल्याने भातपीक पूर्णतः करपले आहे. तालुक्‍यातील सद्य:स्थिती पाहता ही बाब चिंतेची आहे.

अकोले तालुक्‍यातील राजूर, शेंडी व साकिरवाडी महसूल मंडळामध्ये प्रचंड पाऊस पडतो. तर, समशेरपूर, अकोले, वीरगाव, ब्राह्मणवाडा, कोतूळ या मंडलामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही तालुका घटक ग्राह्य धरले आणि या मंडळांचा समावेश त्यात झाला नाही. त्यामुळे तालुक्‍यातील प्रमुख पीक असलेल्या बाजरी, सोयाबीन व भाताची स्थिती अत्यंत वाईट आहे. सरकार नेमक्‍या कोणत्या निकषावर दुष्काळ जाहीर करतेय कळत नाही, पण अकोल्याची अन्य तालुक्‍यांपेक्षा अजिबात वेगळी परिस्थिती नाही. सरकारच्या लोकांनी फार तर तालुक्‍यातील प्रत्येक गावांत जावे, खरीप, रब्बीची पाहणी करावी व दुष्काळ जाहीर करावा; परंतु आदिवासी गरीब लोकांवर अन्याय करू नये. अकोले तालुक्‍यातील हुमणी अळीमुळे ऊसपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या ऊसपिकाचे पंचनामे करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे. दुर्लक्ष केल्यास आंदोलन उभारणार असल्याचे पिचड म्हणाले. दुष्काळ जाहीर करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, मीनानाथ पांडे, यशवंत आभाळे, विश्‍वंभर आरोटे, शंभू नेहे उपस्थित होते.

कोपरगावातही परिस्थिती गंभीर कोपरगाव तालुक्‍यातही पाऊस नाही. खरिपाची पिके वाया गेली असून, रब्बीच्या पेरण्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट आहे. असे असताना मात्र शासनाने दुष्काळ जाहीर करताना अकोल्यासोबत कोपरगावलाही वगळले आहे. हा तालुक्‍यावर अन्याय आहे. प्रशासनाने थेट बांधावर जाऊन परिस्थिती पाहावी आणि दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com