कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांत धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.१९) दुपारी बारा वाजता राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. या दरवाज्यांमधून १२ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडल्याने भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. पाटगाव धरणही शंभर टक्के भरले असून यातून १९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळी वाढणार असल्याने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.
जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी हवामान आहे. जिल्ह्यांत आठ दिवसांपासून दररोज कुठे ना कुठे पाऊस सुरू असला तरी दिवसभर उकाडा होता. परंतु, सोमवारपासून थंड वारे व सातत्याने रिमझिम पाऊस
असे वातावरण तयार झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील सर्वच धरणांत नव्वद टक्क्यांहून अधिक साठा झाल्याने आता पाटबंधारे विभाग पावसाचा अंदाज घेऊन अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्याचा विचार करीत आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही धरणांच्या क्षेत्रात संततधार स्वरुपाची वृष्टी होत असल्याने धरणांच्या पाण्यात वाढ होत आहे.
राधानगरी परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.