अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धात भारताला संधी

चीनने अमेरिकेच्या कापसावर २५ टक्के शुल्क लावले आहे. मात्र भारतीय कापसावर कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही. तसेच, भारतीय कापूस अमेरिकेच्या कापसापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे भारताला निर्यातीत आपले स्थान बळकट करण्यास संधी आहे. - अतुल गणात्रा, अध्यक्ष, भारतीय कापूस महामंडळ
अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धात भारताला संधी
अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धात भारताला संधी

नवी दिल्ली ः चीनने अमेरिकेतून आयात ३३४ वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावले आहे, तर अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या १३०० वस्तूंवर आयात शुल्क लावले आहे. जगातील या सर्वांत मोठ्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये सध्या व्यापारयुद्ध सुरू आहे. याचा फायदा भारताला होणार असून कापूस, मका आणि तेलबिया पेंड निर्यातीला संधी आहे, तसेच आशियायी देशांतील बाजार उपलब्ध होऊ शकतो, असे व्यापरतज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. अमेरिका आणि चीन या जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. मात्र मागील काही दिवासांपासून उभय देशांमध्ये सारे काही आलबेल असे नाही. याचा फायदा भारताला असून कापूस, मका आणि तेलबिया पेंड उत्पादकांना आशियायी देशांतील बाजार उपलब्ध होऊ शकतो. ‘‘आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाच्या किमती स्पर्धात्मक राहिल्यास भारतीय मालाला या बाजारात पाऊल टाकता येणार आहे. सोयाबीन पेंड- मोहरी पेंड या तेलबिया पेंड, कापूस आणि मका निर्यातदारांना संधी आहे. सध्या आमच्याकडे काही प्रमाणात साठा असून चीन हा मोठा उपभोक्ता आणि आयातदार देश आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.  चीनने अमेरिकेतून देशात आयात होणाऱ्या १२८ वस्तूंवर आधीच आयात शुल्क लावले होते, त्यामुळे अमेरिकेच्या या वस्तूंच्या निर्यातीवर परिणाम झाला. परिणामी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी मंगळवारी चीनमधून आयात होणाऱ्या १३०० वस्तूंवर २५ टक्के अायात शुल्क लावले. याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी चीन सरकारनेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या आणखी १०६ वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावले. अशाप्रकारे या दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाले आहे.  ‘‘भारतीय कापूस स्वस्त असल्याने चीन प्राधान्य देण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या कापडावर २५ टक्के शुल्क लावल्याने भारतातून कापड खरेदी करण्याची शक्यता आहे. त्यातही भारताला संधी आहे. सोबतच चीनने निर्बंध काढल्यास भारताच्या सोयाबीन पेंडेलाही बाजारपेठ उपलब्ध होईल. सध्या चीनच्या मागणीच्या जवळपास ३९ टक्के निर्यात अमेरिकेतून होते,’’ भारतीय कापूस महामंडळाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले.  सोयाबीन प्रक्रिया संघाचे अध्यक्ष दाविश जैन म्हणाले, की चीनमधील जनावरे आणि पोल्ट्री उद्योगासाठी भारतीय सोयाबीन पेंड निर्याताला खूप मोठी संधी आहे. भारतीय सोयाबीन पेंड आयातीवरील निर्बंध काढण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय चीन सरकारशी बोलणी करणार आहे. तसेच, चीन निर्यात करत असलेल्या जपान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम ही नवीन बाजारपेठ देखील भाराताला उपलब्ध होऊ शकते. कापूस निर्यातवाढीला संधी  यंदा चीनमध्ये कापूस लागवडीचे नियोजन चुकल्याने कापसाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. देशातील गरज भागविण्यासाठी चीनने कापूस आयातीसाठी दारे उघडी केली. चीनमध्ये होणाऱ्या कापूस निर्यातीमध्ये अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. चीनने आतापर्यंत ५ दशलक्ष गाठी कापसाची आयात केली आहे. या आयात कापसापैकी तब्बल ४० टक्के कापूस अमेरिकेतून निर्यात झाला आहे. आता अमेरिका आणि चीन या देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाल्याने चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापसावर २५ टक्के शुल्क लावले आहे.  भारातातून आयात होणाऱ्या कापसावर कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही, त्यामुळे भारताला चीनमध्ये कापूस निर्यात वाढविण्यास संधी आहे, असे व्यापरी व निर्यातदारांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com