पीकविम्याच्या नावाखाली भाजप सरकारकडून शेतकऱ्यांची लूट : अनिल देशमुख

माजी मंत्री अनिल देशमुख
माजी मंत्री अनिल देशमुख

मुंबई : शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेताना पिकविम्याची रक्कम कापण्यात येते. यावर्षी सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून पाण्याअभावी संत्रा व मोसंबीची झाडे वाळत आहेत. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करुन एकाही रुपयाची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यातच पीकविम्यापोटी मिळणारी रक्कमही देण्यात आलेली नाही. एकप्रकारे पीक विम्याच्या नावाखाली भाजपा सरकार हे विमा कंपन्यांना संरक्षण देऊन शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला.

राष्ट्रीयीकृत बँकांमधून पीककर्ज घेतेवेळी पिकांचा पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत खासगी विमा कंपन्यांमार्फत विमा काढण्यात आला. त्या विम्याच्या हप्त्यांची रक्कमही कर्ज उचल करतेवेळी कपात केली होती. यात संत्रा, सोयाबीन, कपाशी व इतर खरीप पिकांचा समावेश होता. यात संत्रा व खरीप पिकांचा विमा वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत काढण्यात आला. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून पीकविम्याच्या नावाखाली करोडो रुपये विमा कंपन्यांनी गोळा केले आहेत. दुष्काळग्रस्त तालुक्यातील खरीप पिकांचे जवळपास पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे पीकविम्याचा लाभ हा राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. परंतु विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत या शेतकऱ्यांना अद्यापही देण्यात आलेली नाही. शेतकरी विमा कंपनींच्या अधिकाऱ्यांना फोन करतात. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद त्यांना मिळत नाही. अशा परिस्थितीत सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे. परंतु दुष्काळ जाहीर करून एकाही पैशाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न करणारे भाजप सरकार हे पीकविमा कंपन्यांना अभय देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोपही श्री. देशमुख यांनी केला आहे.

दुष्काळ जाहीर करून एका पैशाची मदत नाही, कर्जमाफीचा घोळ अद्यापही कायम असून २० टक्के शेतकऱ्यांना सुध्दा याचा फायदा झालेला नाही. शेतकऱ्यांना मदत देण्याचे तर सोडाच, पण त्यांच्या हक्काची पीकविम्याची रक्कमसुद्धा त्यांना मिळत नाही. नवीन कर्जवाटपात विविध कारणे देऊन कपात करण्यात आली आहे. यामुळे येत्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी सुध्दा शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत विमा कंपनीची कान उघडणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्याची मदत मिळून देणे भाजप सरकारकडून अपेक्षित आहे. परंतु सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नसून विमा कंपन्यांना पाठीशी घालत आहे. यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही या वेळी श्री. देशमुख यांनी दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com