‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार : राधामोहनसिंह

‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार

मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’ प्रकल्पाच्या माध्यमातून सशक्त करण्याला केंद्र शासनाने प्राधान्य दिले असून, याद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करताना बाजार समित्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करावयाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी केले. क्रॉप केअर फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारे बुधवारी (ता. २३) आयोजित ‘शेती अधिक किफायतशीर करण्यासाठी सरकार, उद्योग आणि शेतकरी एकत्र काम करू शकतात’ या विषयावरील एकदिवसीय परिषदेमध्ये ते बोलत होते. या वेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला, राज्याचे कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, यूपीएलचे अध्यक्ष रज्जू श्रॉफ, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विलास भाले आदी उपस्थित होते. श्री. सिंह म्हणाले, की आज देशातील शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. या अडचणी दूर करावयाच्या असतील तर सरकार आणि उद्योगपतींनी एकत्र येऊन कृषी क्षेत्राला मदतीची गती वाढवण्याची गरज आहे. शेतकरी जगला तर देश जगेल हे आपण लक्षात घेतले पहिजे. कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात अर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही कृषी केंद्रित अनेक निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. ‘जलयुक्त शिवार’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेने राज्यातील अनेक गावे जलसंपन्न झाली आहेत.  शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवीत आहे, ज्याद्वारे त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळत आहे. यामध्ये कृषिपूरक उत्पादनांवर आधारित उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे. मोदी सरकारने राष्ट्रीय आपत्ती निधीतून भरघोस मदत केली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात आहे. ‘कृषी संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज’ शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करताना शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन होणे काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विद्यापीठांनी कृषी केंद्रित संशोधनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये असे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याने कृषी विद्यापीठात कृषी आधारित संशोधन केंद्र निर्माण करावे, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, रज्जू श्रॉफ यांची भाषणे झाली. परिषदेच्या सुरवातीला यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांतील प्रगतिशील शेतकऱ्यांचा १० मिनिटांचा लघुपट दाखविण्यात आला. तसेच ‘यू टर्न स्टोरी यवतमाळ बुक’ पुस्तिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com