धुळे ः नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील पपई पिकाखालील क्षेत्र रिकामे व्हायला सुरवात झाली आहे. उष्णतेमुळे पपईची मागणी कमी झाली आहे. त्यातच फळांचा आकारही हवा तसा नसतो. त्यामुळे अधिक दिवस पपईचे पीक न घेण्याचा कल शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे.
धुळ्यात सुमारे ८०० तर नंदुरबारात सुमारे १२०० हेक्टरवर पपईची लागवड झाली होती. सर्वाधिक लागवड शहादा (जि. नंदुरबार) व शिरपूर (जि. धुळे) भागात झाली होती. यंदा तीन वेळा पपईदराचा तिढा निर्माण झाला.
नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी पपईची काढणी बंद पाडली. सात रुपये प्रतिकिलो दर मागितला होता. नंतर सहा रुपये ७५ पैसे दरांवर व्यापारी व शेतकऱ्यांचे एकमत झाले. पुन्हा जानेवारीत दराचा तिढा निर्माण झाला. या वेळेसही व्यापाऱ्यांनी दर कमी करा, अशी मागणी केली. त्यावर सहा रुपये ३५ पैसे दर निश्चित झाले. शहादा येथे त्यासाठी शेतकरी व व्यापारी यांच्या बैठका झाल्या. पुन्हा फेब्रुवारीत दरांचा मुद्दा व्यापाऱ्यांनी पुढे केला.
अशातच पपई हे उष्ण फळ असल्याने जशी उष्णता वाढायला लागली, तशी तिची मागणी ग्राहकांमध्ये कमी झाली. मार्चमध्ये चेरी कारखान्यांकडून मागणी कायम राहिली आहे. कारखानदार तीन रुपये प्रतिकिलो या दरात पपईची खरेदी करीत आहेत. यातच पपईचा हंगामही अंतिम टप्प्यात आल्याने क्षेत्र रिकामे करायला सुरवात झाली आहे.
क्षेत्र रिकामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जात असून, सुरवातीला कच्ची फळे काढून झाडे नष्ट केली जात आहेत. ट्रॅक्टरचालक एकरी १००० रुपये असे दर क्षेत्र रिकामे करण्यासाठी घेत आहेत. काही शेतकरी मजुरांच्या साह्याने झाडे काढत आहेत.
तळोदा तालुक्यात मात्र अजूनही अनेक शेतांमध्ये पपईचे पीक आहे. या भागातून मध्य प्रदेश व गुजरातचे व्यापारी चेरी कारखान्यासाठी पपईची कच्ची फळे नेत आहेत, असे सांगण्यात आले.