पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. कृषी विभागाने केलेल्या नियोजनानुसार जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांची दोन लाख ३० हजार ८२६ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज असून सुमारे ६४ हजार ८०० हेक्टरवर भात लागवड अपेक्षित आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात दोन लाख ५ हजार ७३७ हेक्टरवर विविध खरीप पिकांची पेरणी झाली होती. तीन लाख २४ हजार ६८३ मेट्रीक टन पीक उत्पादन झाले होते. यंदा पावसाच्या चांगल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची एप्रिलपासूनच खरिपाची तयारी सुरू आहे.
भात पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सध्या शेतीची मशागतीची कामे हाती घेतली आहे. काही शेतकरी भात बियाणांची उगवणक्षमता तपासून घेण्यास प्राधान्य देत आहेत. पूर्व पट्ट्यातील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, शिरूर भागांतही शेतकऱ्यांनी नांगरणी करून पेरणीकरिता शेत तयार ठेवण्यासाठी कामे सुरू केली आहे.
खरिपात तृणधान्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका या पिकांची पेरणी शेतकरी करतात. कडधान्यामध्ये तूर, मूग, उडीद तर गळीतधान्यामध्ये भूईमूग, खरीप तीळ, कारळा, सुर्यफूल, सोयाबीन या पिकांची शेतकरी पेरणी करतात.
गेल्यावर्षी भाताची ५९ हजार ४४५ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा भात लागवडक्षेत्रात ५३५५ हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सोयाबीनची १८ हजार ६६३ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८३७ हेक्टरने क्षेत्र वाढण्याची शक्यता असून सुमारे २२ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे, तर उत्पादन ६० हजार ७५० मेट्रिक टन एवढे अपेक्षित आहे.