बाजारपेठेवरील सर्व बंधने हटवा : अशोक गुलाटी

बाजारपेठेवरील सर्व बंधने हटवा : अशोक गुलाटी
बाजारपेठेवरील सर्व बंधने हटवा : अशोक गुलाटी

पुणे : भारतीय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी नेते शरद जोशी यांनी मांडलेली मुक्त बाजारपेठेची संकल्पना परिवर्तनकारी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारला शेतकऱ्यांची दुरवस्था संपविण्याची इच्छा असल्यास शेतमाल बाजारातील सर्व बंधने काढून टाकावीत, असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी केले.  पुण्यातील गोखले इन्‍स्‍टिट्यूट आणि शेतकरी संघटना ट्रस्टच्या वतीने आयोजिलेल्या शरद जोशी स्मृति व्याख्यानमालेत ‘‘शेतकऱ्यांच्या मदतीचे उत्तम मार्ग" या विषयावर ते बोलत होते. या वेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी संघटना ट्रस्टचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, प्रा. राजस परचुरे, कृषी अर्थतज्‍ज्ञ डॉ.प्रदीप आपटे व इतर मान्यवर उपस्थित होते.  शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असल्यास शरद जोशी यांनी मुक्त बाजारव्यवस्था आणि तंत्रज्ञानाचा अवलंब या दोन तत्वांचा नारा दिला होता. त्यांनी काही दशकांपूर्वी धरलेला या दोन्ही संकल्पना आजही उपयुक्तच नव्हे तर त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही, असे सांगून श्री. गुलाटी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे मार्ग आणि नवे तंत्रज्ञान बंद असल्यास देशाच्या कृषी उत्पादनात वाढ करणे धोक्याचे आहे. ‘‘देशात स्वदेशी वाणांची लागवड होत असताना अन्नधान्याची टंचाई होती. विदेशी वाणांची आयात करून उत्पादन वाढविण्यास तत्कालीन राजवटींमध्ये विरोध झाला होता. मात्र, शरद जोशी स्वतः नव्या कृषी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही होते. नवे तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे देशाच्या अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.  भारत हा जगाच्या पाठीवरचा गरीब ग्राहक वर्ग असलेला आणि उत्पादक शेतकरी वर्ग असलेला सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे सरकारला ग्राहक आणि उत्पादक या दोन्ही वर्गासाठी विविध धोरणे ठरविताना विचित्र कसरत करावी लागते. त्यातून शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या धोरणांचीच आखणी बहुतेक वेळा होते. सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना उपयुक्त धोरणांचा स्वीकार न केल्यास शेतकरी वर्गाच्या समस्या आणखी वाढतील, असा इशारा श्री. गुलाटी यांनी दिला. पाशा पटेल यांनी  पंतप्रधानांना सांगावे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून अनेक सल्ले केंद्र सरकारला दिले जातात. त्यांच्या व्हॉटसअपवरील डीपीमध्ये एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात श्री. पटेल हे काही तरी सांगत असल्याचे दिसते आहे. त्यांनी काय सांगितले हे कळलेले नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा आणि तंत्रज्ञानावरील बंधने आता हटवा, असे देखील पाशा पटेल यांनी आता पंतप्रधानांच्या कानात सांगण्याची गरज आहे, असे उद्गगार अशोक गुलाटी यांनी आपल्या भाषणात काढले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com