राज्यात हरभऱ्याचा पेरा वाढविण्यासाठी प्रयत्न

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : रबी हंगामात राज्यातील हरभरा क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेताना हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना २१ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरभरा उत्पादनात देशात मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणाचे एक प्रमुख उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्र यंदादेखील आघाडी घेण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या अनेक वर्षांत लागवडीची वाटचाल पाहिल्यास सरासरी क्षेत्र १३ लाख हेक्टर आहे. मात्र, गेल्या हंगामात राज्यात हरभऱ्याचा पेरा १८.५० लाख हेक्टरवर झाला. यंदा हाच पेरा १९ लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडापासूनच विविध भागांमध्ये हरभरा पेरण्यास सुरवात झाली आहे. डिसेंबरच्या पंधरवड्यापर्यंत पेरा चालू राहण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर तर बीड, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एक लाखाहून जास्त हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होण्याची शक्यता आहे.

राज्यभर चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा रबी हंगामात हरभरा पिकाच्या उत्पादनावर मुख्य भर देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यासाठी १७ कोटी ५० लाख रुपये अनुदान खर्च करून जवळपास ७० हजार क्विंटल बियाणे वाटण्यास सुरवात केल्याची माहिती राज्याचे कृषी विस्तार संचालक डॉ. एस. एल. जाधव यांनी दिली.

शेतकऱ्यांना जॅकी ९२१८ आणि आकाश या वाणाचे अनुदानित बियाणे पुरवठ्याची जबाबदारी महाबीजवर सोपविण्यात आली आहे. काही प्रमाणात राष्ट्रीय बीज महामंडळाकडून देखील बियाणे दिले जात आहे. शेतकऱ्यांना प्रतिकिलो २५ रुपये अनुदान दिले जात असून महाबीजच्या विक्रेत्यांकडून अनुदानित बियाण्यांची विक्री सुरू आहे.

हरभरा उत्पादन वाढीसाठी यंदाची अनुकूल स्थिती लक्षात घेत १०५० शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांचे पेरणीयंत्र वाटले जात आहे. याशिवाय १३०० शेतकऱ्यांना एक कोटी ३० लाख रुपये खर्च करून पंपसंचासाठी अनुदान वाटले जाईल. पेरणीयंत्र व पंपसंचासाठी राज्यात शेतकऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली आहे.

शेतकऱ्यांना हरभरा उत्पादन वाढीसाठी ३ लाख मीटर पाईप वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. लातूर जिल्ह्यात ३३ हजार मीटर तर उस्मानाबाद २२५०० मीटर, नांदेड १८००० मीटर तर यवतमाळमध्ये २३४०० मीटर पाईप वाटले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी बीजप्रक्रियेनंतर हरभरा लागवड केल्यास फुले येण्याच्या टप्प्यात चांगले पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

बाजार टिकून असल्यामुळे पेरा वाढणार खरिपात तुरीने फजिती केली. मात्र हरभऱ्याचे बाजार टिकून असल्यामुळेच शेतकऱ्यांचा कल यंदाही हरभरा लागवडीकडे आहे. याशिवाय भारतातून हरभरा निर्यात सुरू करता येते का; तसेच विदेशी हरभरा आणि पिवळा वाटाणा आयात कशी रोखता येईल यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर धोरणात्मक बदलासाठी हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास हरभरा बाजारपेठेची स्थिती मजबूत राहू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com