जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया केवळ नावालाच उरल्याची स्थिती आहे. धान्य आणल्यानंतर ते व्यापाऱ्यांकडे ठेवण्याची वेळ येत असल्याने धान्याच्या आवकेत घट झाल्याची माहिती आहे.
बाजार समितीमध्ये सप्टेंबर महिन्यात धान्य लिलावाची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु सध्या आवक झालेल्या पूर्ण धान्याचा लिलाव होत नाही. अर्धेअधिक धान्य शेतकऱ्यांना बाजार समिती यार्डातच ठेवण्याची वेळ येते. त्याची जबाबदारी बाजार समिती स्वीकारत नाही, म्हणून नाईलाजाने हे धान्य अडतदारांच्या दुकानांमध्ये टाकावे लागते. लिलाव प्रक्रिया ठप्प झाल्याचा फटका शेतकऱ्यांसह बाजार समितीला बसू लागला आहे.
लिलाव होऊन लागलीच पैसे मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा चोपडा, अमळनेर बाजार समितीला पसंती देऊ लागले आहेत. शेतीमाल बाजार समितीत पोचविल्यानंतर लागलीच त्याचे पैसे शेतकऱ्यांना हवे असतात. इतर अनेक अडचणी त्यांच्यासमोर असतात. जळगाव बाजार समितीमधील लिलाव प्रक्रिया बारगळल्याच्या प्रकाराकडे पदाधिकाऱ्यांचेही फारसे लक्ष नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे.
बाजार समितीमधील धान्य मार्केट यार्डात उडीद, मूग व सोयाबीनची आवक सुरू होती. हरभरा, दादर (ज्वारी)चीदेखील काही प्रमाणात आवक व्हायची. परंतु लिलाव प्रक्रियेवर परिणाम झाल्याने आवकेत घट झाली आहे. रोज ६० ते ७० क्विंटल मूग, १०० ते ११० क्विंटल उडीद आणि ३०० ते ३५० क्विंटल सोयाबीनची आवक होत असल्याची माहिती मिळाली.
यातील कमाल धान्याचे लिलाव होत नाहीत. ते अडतदारांकडे ठेवावे लागते, असे सांगण्यात आले. लिलाव प्रक्रिया उघड्यावरच सुरू होती. बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयानजीकच्या मुख्य रस्त्यावर लिलाव व्हायचे. लिलावांसाठी स्वतंत्र शेड व जागा निश्चित केली जावी. ती शेतीमाल आणण्यासाठी सुकर असावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.