सातारा ः जिल्ह्यातील उरमोडी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणात यंदा गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी अधिक उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या महिन्यात तसेच परतीचा दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे पाण्याने तुुडुंब भरली होती. पाणीसाठा नियंत्रित रहाण्यासाठी कोयनेसह बहुतांशी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. यामुळे धरणातील पाणीपातळी समाधानकारक झाली असून सर्वच धरणांत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा आहे.
कोयना धरण हे राज्यासाठी वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असून यात सध्या एकूण ७२.०८ टीएमसी तर उपयुक्त ६६.९५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी या धरणात आजच्या तारखेला ५१.७८ टीएमसी एकूण तर ४६.६६ टीएमीसी उपयुक्त पाणीसाठा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत कोयना धरणात २०.२९ टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. यामुळे ऐन उन्हाळात वीज भारनियमनात केली जाणारी वाढ टाळता येणार आहे. तसेच कोयना नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांनादेखील पाणी उपलब्ध होणार आहे.
उरमोडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणात गतवर्षी उपयुक्त ७.६७ तर यंदा ७.३७ टीएमसी पाणीसाठा आहे. उरमोडी कण्हेर ही धरणे दुष्काळी तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाची धरणे आहे. याही धरणात चांगला पाणीसाठा आहे.