बुलडाणा ः कर्जमाफी झाली...काहींचे कर्ज खाते ‘नील’ झाले...काहींबाबत ही प्रक्रिया सुरू अाहे. ज्यांची खाती कर्जमुक्त झाली, असे शेतकरी अाता अापल्या मूळ शाखांकडे गेले असता या बँकांकडून पीककर्ज देण्यास टोलवाटोलवी केली जात अाहे. यामुळे शेतकऱ्यांची एेन हंगामाच्या तोंडावर चिंता वाढली अाहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की जिल्हयात जिल्हा मध्यवर्ती बँक अवसायनात निघाल्यानंतर अनेक खातेदार शेतकऱ्यांची खाती ही एकाच शाखेकडे जास्त भार निर्माण होऊ नये, यासाठी विविध गावांतील राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात अाली होती. या बँकांकडून शेतकरी नियमित व्यवहारासह पीककर्ज घेत होते. शासनाने कर्जमाफी केल्याने अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. त्यामुळे अागामी हंगामासाठी हे शेतकरी पुन्हा अापल्या बँकेत कर्ज मागणीसाठी गेले असता, या बँक शाखा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला जात अाहे.
वरवट बकाल येथील काही शेतकऱ्यांना बावनबीर येथील बँक अाॅफ महाराष्ट्रच्या शाखेत काही वर्षांपूर्वी वर्ग केलेले आहे. हे शेतकरी अाता कर्ज मागणीसाठी गेले तर त्यांना बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार देत तुमच्या गावातील बँकेतून कर्ज घ्या, असे सांगितले.
हे शेतकरी गावातील ग्रामीण बँकेच्या शाखेत कर्ज मागणीसाठी गेले तर त्यांना येथील अधिकाऱ्यांनी असा काही नियम नसल्याचे सांगत तुम्ही जुन्याच बँकेतून कर्ज घ्या, असे सांगण्यात अाले. गावातील ग्रामीण बँकेतून कर्ज घ्यायचे तर या ठिकाणी हे शेतकरी नवीन खातेदार बनतील. त्यामुळे पीककर्ज मिळण्याची त्यांची पत अापोअाप कमी होईल, याची भीती शेतकऱ्यांना वाटत अाहे. एकूणच सध्या हा गोंधळ वाढत चालला अाहे.
पीककर्ज घेण्यास शेतकऱ्यांना क्षेत्राचे बंधन नाही. रिझर्व्ह बँकेचे सर्क्युलर सगळ्यांना दिले. ग्रामीण बँकेत काही प्रमाणात अडचणी अाहेत. मात्र इतर बँकांना हे नियम लागू होत नाही. त्यांनी अापल्या ग्राहकांना प़ूर्वीप्रमाणे कर्ज द्यायलाच हवे. शेतकऱ्यांना ‘नो ड्युज’ सर्टिफिकेट देऊन टाळणे योग्य नाही, असे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.