बोंड अळीप्रश्नी जबाबदारी सरकारचीच

बोंड अळीप्रश्नी जबाबदारी सरकारचीच
बोंड अळीप्रश्नी जबाबदारी सरकारचीच

नागपूर : बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने स्वतःच्या खिशातून मदत द्यावी, अशी मागणी करीत पीकविमा, बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळाल्यानंतर स्वतःकडे ठेवावी, ती जबाबदारी सरकारचीच असा सल्ला, स्वाभिमानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला, तसेच राज्यात लहान पक्षांनी मोट बांधत तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न केल्यास त्याला सहकार्य राहील. मात्र, नेतृत्वावरून साशंकता निर्माण होऊ नये, म्हणून पुढाकार घेणार नाही, असेही त्यांनी मंगळवारी (ता. २६) घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार शेट्टी यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या नावावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भावनेचा खेळखंडोबा करीत असल्याचा आरोप केला. तसेच दोन वर्षांपूर्वी सोयाबीनसाठी जाहीर केलेल्या दोनशे रुपये मदत अद्याप मिळाली नाही. त्यामुळे बोंड अळीने नुकसानग्रस्त कापूसउत्पादकांना मदतीचा आकडा आकर्षक असला तरी तो कधी भेटणार? याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली.

दरम्यान बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळणार, असे सरकारने सांगितले. परंतु काही कंपन्या न्यायालयात गेल्या. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला नाही, त्यांचे काय?, एनडीआरएफकडून निधी मिळणार असल्याचे सांगितले, पण केंद्राची मंजुरी आहे काय? असा सवाल करीत त्यांनी सरकारने स्वतःच्या खिशातून शेतकऱ्यांना मदत द्यावी, त्यानंतर पीक विमा किंवा बियाणे कंपन्यांकडून मिळणारी रक्कम स्वतःकडे ठेवून घ्यावी, असे ते म्हणाले.

मोन्सेन्टो आदी कंपन्यांचे बियाणे वापरुनही बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. कापसाचे एकरी १५ क्विंटल नुकसान झाले, कंपन्यांकडून १५ क्विंटल कापसाची नुकसानभरपाई सरकारने वसूल करावी, असे ते म्हणाले. अन्यथा शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी जनआंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीसंबंधातील तसेच उत्पादनाला हमी देण्यासंदर्भात संसदेत अशासकीय ठराव मांडणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी व उत्पादनाला हमी भाव याबाबत कायदा तयार करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडे मदत मागणार आहे. यातून आता राजकीय पक्षांचे शेतकरी प्रेम बेगडी की खरे, हेही कळून चुकेल, असेही ते म्हणाले.

'लढल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत' सरकारने पामतेलाची आयात केली. त्यामुळे सोयाबीनचे दर पडले. हीच अवस्था उडीद, मूग आणि तूरडाळीची झाली. सरकारच्या अशा धोरणांविरुद्ध शेतकऱ्यांनी लढण्यासाठी सज्ज झाल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी मूर्तिजापूर येथे सोमवारी (ता. २५) आयोजित शेतकरी व शेतमजूर एल्गार मेळाव्यात केले. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला. या कर्जाची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही, तर सरकारची असल्याचे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com