अकोला ः केळीच्या उत्पादनासाठी जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्याची ओळख आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय व यंत्रणांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील शेतकरी आता निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणार आहेत. या दृष्टीने वेळोवेळी नियोजनाच्या बैठका झाल्या असून शनिवारी (ता.२३) झालेल्या बैठकीत करारावर अंतिम निर्णय झाला. तीनशे एकरांतील करार पूर्ण झाला असून लवकरच दोनशे एकरांवरील केळीचा करार होईल, अशी माहिती मिळाली आहे. शिवाय दोनशे एकरांवर कंपन्या स्वतः निर्यातक्षम केळीचे दर्जेदार उत्पादन घेणार आहेत.
अकोला जिल्ह्यात केळी पिकाचे मोठे क्षेत्र आहे. परंतु, ही उत्पादित केलेली केळी स्थानिक पातळीवरच विकली जाते. चांगली जमीन, हवामान तसेच शेतकऱ्यांची मेहनतीची तयारी असल्याने शेतकरी कंपनी व जिल्हा प्रशासनाने निर्यातक्षम केळीच्या उत्पादनासाठी पुढाकार घेतला. काही महिन्यांपूर्वी एक कंटेनर विदेशात निर्यातसुद्धा झाला. यामुळे उत्साह वाढलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने पाठबळ देत केळी उत्पादनासाठी सर्वच प्रकारची माहिती व सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले. जिल्हाधिकारी पांडेय यांनी यात विशेष पुढाकार घेतला. जिल्ह्यात किमान १० हजार प्रयोगशील शेतकरी निर्माण करण्याचे त्यांनी ठरवलेले असून त्याचाच भाग म्हणून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्यास पुढाकार घेतला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अपेडा, मार्केटिंग विभाग, कृषी खाते, आत्मा तसेच शेतकरी कंपनी आणि निर्यातदार एकत्र आले आहेत. शनिवारी झालेल्या बैठकीला श्री. पांडेय यांच्यासह अपेडाचे प्रशांत वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी अशोक कंडारकर, उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर, मार्केटिंग बोर्डाचे श्री. साबळे, आत्मा प्रकल्प संचालक एस. एल. बाविस्कर, शेतकरी कंपनीचे पंजाबराव बोचे, मोहन सोनोने व अन्य संचालक तसेच निर्यातदार कंपन्यांमध्ये आयएनआयचे पंकज खंडेलवाल, सांगोला एक्स्पोर्ट लिमिटेड प्रशांत चांदणे, व्हाइट ग्लोचे सुशांत फडणीस आणि देसाई फूड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत करार पद्धतीने केळी उत्पादनाबाबत चर्चा झाली. निर्यातक्षम केळी उत्पादनासाठीच्या बाबींवर चर्चा झाली. करारानुसार केळी उत्पादकांना दर्जेदार बेणे, तंत्रज्ञान, माहिती या कंपन्यांकडून सातत्याने दिली जाईल. या केळीची खरेदी त्या काळातील रावेर बाजारातील दर व त्यापेक्षा अधिक १०० रुपये असा दर दिला जाईल. करार शेतीमध्ये १९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.