नांदेड ः केळी उत्पादक पट्टा म्हणून ओळख असलेल्या अर्धापूर (जि. नांदेड) तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागांतील केळी पिकाच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. वाढत्या उन्हामुळे केळी बागा जागेवरच होरपळत आहेत. उभ्या बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. बागा नष्ट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, अर्थकारण बिघडले आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका केळी उत्पादक तालुका म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. मुदखेड, हदगाव या तालुक्यांत, तसेच नांदेड, भोकर तालुक्यातील काही गावांत केळी लागवड केली जाते.
जिल्ह्यात १० ते १२ हजार हेक्टरपर्यंत केळी पिकाची लागवड होते. यंदा इसापूर आणि सिद्धेश्वर हे धरण प्रकल्प भरतील, सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, या अपेक्षने शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे केळी लागवड केली. परंतु जुलै - आॅगस्टमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडला. विहिरी, बोअरचे पाणी सिंचनासाठी कमी पडू लागले. दोन्ही धरणे भरली नाहीत. कालव्याच्या आवर्तनाची शक्यता मावळली.
अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आॅगस्ट- सप्टेंबरमध्येच केळी बागा मोडून टाकल्या, रब्बीतील पिके घेतली; परंतु त्या वेळी बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे आजवर जोपासलेल्या बागांना आता पाणी कमी पडू लागले आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे झाडाची पाने करपून जात आहेत, तसेच वाऱ्यामुळे पाने फाटत आहेत. त्यात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे केळीचे फड होरपळून जात आहेत. यामुळे मोठे नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
अर्धापूर तालुक्यातून पंजाब, हरियाना राज्यांत केळी पाठवली जातात. केळी काढणीच्या हंगामात काही हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु यंदा बागांचे नुकसान झाल्यामुळे उलाढाल कमी होणार आहे.