अर्धापूर, जि. नांदेड ः केळी पिकासाठी पाणी अपुरे पडणार असल्यामुळे शेतकरी केळीच्या बागा मोडून टाकत आहेत.
अर्धापूर, जि. नांदेड ः केळी पिकासाठी पाणी अपुरे पडणार असल्यामुळे शेतकरी केळीच्या बागा मोडून टाकत आहेत.

अर्धापूर तालुक्यात केळीबागांवर संकट

अर्धापूर, नांदेड ः अर्धापूर तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस तसेच उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर येथील धरणामध्ये सध्या जेमतेम १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा सिंचनासाठी पाणी मिळण्याची खात्री दिसत नसल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी केळीच्या बागा मोडून टाकत आहे.

यंदा अर्धापूर तालुक्यात केळीच्या लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली अाहे. जेमतेम ५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. इसापूर धरणामध्ये यंदा मुबलक पाणीसाठा होऊन सिंचनासाठी पाणी मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. परंतु आजवर इसापूर धरणामध्ये जेमतेम १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

यंदा हे धरण न भरल्यामुळे अर्धापूर, नांदेड, मुदखेड, हादगाव यासह परिसरातील केळी उत्पादकांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. अर्धापूर तालुक्यात केळीची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. हा भाग केळीसाठी प्रसिद्ध आहे. इसापूर धरणाचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होते.

गेल्या वर्षी हे धरण पन्नास टक्के भरले होते. त्यामुळे गेल्या वर्षी पाच आवर्तने मिळाल्यामुळे केळीचे चांगले उत्पादन मिळाले. बाजारभाव चांगला मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. यंदाही गतवर्षी प्रमाणे पाऊस होऊन पाणी उपलब्ध होईल या आशेवर शेतकऱ्यांनी जून, जुलैमध्ये केळीची लागवड केली होती.

केळी लागवडीसाठी मोठा खर्च येतो. केळीचे ऊतीसंवर्धित रोप दहा ते पंधरा रुपयाला मिळते. तसेच बेनेही विकत घ्यावे लागते. बेने लागवड, शेतीची मशागत, खतांची मात्रा यांवर खूप मोठा खर्च होतो. काही शेतकऱ्यांनी केळीच्या बागांना खतांच्या मात्रा दिल्या होत्या. केळीची वाढ चांगली झाली होती. पाऊस चांगला होईल, धरण भरेल या आशेवर शेतकरी होते. पाणी उपलब्ध न झाल्यामुळे केळीच्या बागा मोडून टाकाव्या लागत आहे.

तालुक्यातील सुमारे १०० एकरवरील केळी मोडून टाकल्या आहे. त्यामुळे या पिकांवर आजवर केलेला सर्व खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. केळी बागांचे मोठे नुकसान यंदा तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे विहिरी भरल्या नाहीत. पाणीपातळी खोलवर गेली आहे. तसेच धरणातही पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे केळीच्या बागा कापून काढल्या आहेत. मोठे आर्थिक आर्थिक नुकसान झाले आहे, असे शेतकरी प्रमोद मुळे, अवधूत कदम, ज्ञानेश्वर भांगे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com