जळगाव : जुनारी केळी बागांमधील केळी खरेदीबाबत व्यापारी टाळाटाळ करत आहेत. कापणीस उशीर होत असल्याने अनेक घड बागेतच पिकून नुकसान होत असून, अनेक व्यापारी दर पाडून केळीची मागणी शेतकऱ्यांकडे करत आहेत.या प्रकाराबाबत बाजार समिती मात्र दुर्लक्ष करत असून, कुठलीही कारवाई झाली नसल्याचे चित्र आहे.
चोपडा, जळगाव भागात कांदेबागअधिक आहे. सप्टेंबरमध्ये कापणी सुरू झाली. अनेक बागांची कापणी ६० ते ७० टक्के झाली आहे. आता ३० ते ३५ टक्के केळी या बागांमध्ये आहेत. या बागा जुनारीमध्ये मोडल्या जात असून, त्यातील केळी दुय्यम दर्जाची असल्याचे सांगत व्यापारी त्यांची प्रचलित दरांपेक्षा २०० रुपये कमी दराने मागणी करत आहेत. तसेच अनेक व्यापारी कापणीला येतो, असे सांगून एक ते दोन आठवडे उशीर करत आहेत. त्यात केळी शेतातच पिकून केळी उत्पादकांचे नुकसान होत आहे.
याकडे बाजार समिती प्रशासन मात्र काहीसे दुर्लक्ष करत असून, कमी दरात किंवा दर पाडून केळीची खरेदी करणाऱ्या व्यापऱ्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही. चोपडा, रावेर व जळगाव बाजार समिती यासंबंधी बघ्याची भूमिका घेत आहे, अशी नाराजी केळी उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
केळीचे दर रोज रावेर (जि. जळगाव) कृषी उत्पन्न बाजार समिती जाहीर करते. कांदेबाग, पिलबाग, जुनारी यासाठी वेगवेगळे दर आहेत. या तिन्ही दरांपेक्षा २०० रुपये क्विंटलमागे कमी देऊन केळी उत्पादकांना काही व्यापारी नाडत आहेत. ज्या शेतकऱ्याने कमी दरात केळी देण्यास नकार दिला त्यांची केळी व्यापारी लॉबी खरेदी करत नाही. अखेरीस संबंधित शेतकऱ्याचे नुकसान होते. दिवाळीनंतर हा प्रकार अधिकच दिसून येत आहे.