सीमाभागात ऊस दर आंदोलनाची ठिणगी

belgaum-news-agitation-sugarcane-rate
belgaum-news-agitation-sugarcane-rate

निपाणी, जि. बेळगाव, कर्नाटक : सीमाभागातील साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामातील उसाला जयसिंगपुरातील ऊस परिषदेत ठरल्यानुसार 3400 रुपयांचा पहिला हप्ता विनाकपात जाहीर करण्याची मागणी करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. 30) निपाणीसह भागात विविध ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून आंदोलन केले. शिवाय मांगूर, सौंदलगा, यमगर्णी, निपाणी येथील दूधगंगा, हालसिध्दनाथ, संताजी घोरपडे (काळम्मा बेलेवाडी) या कारखान्यांच्या केंद्र कार्यालयांना टाळे ठोकून कार्यालये बंद पाडली.

जोपर्यंत कारखाने दर जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोडणी न देण्याचे आवाहन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले. जयसिंगपूरला खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊस परिषद झाल्यावर सीमाभागात आंदोलनाची ठिणगी सोमवारी (ता. 30) पडली. सकाळपासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जमून केंद्र कार्यालये बंद पाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर मांगूर, सौंदलगा, यमगर्णी व निपाणीतील राष्ट्रीय महामार्गावरुन कारखान्यांना ऊस वाहून नेणारे ट्रॅक्‍टर ट्रॉली, बैलगाडी अशी वाहने दिसतील तेथे रोखली. अनेक ट्रॅक्‍टर व बैलगाडीच्या चाकातील हवा कार्यकर्त्यांनी सोडली. त्यामुळे वाहने जागेवरच थांबून राहिली. 

ग्रामीण भागातील वाहने अडवून कार्यालये बंद पाडल्यावर कार्यकर्त्यांनी येथील वाळवे मळ्यानजीक सुमारे पाच वाहने रोखली. यावेळी "3400 रुपयांची पहिली उचल मिळालीच पाहिजे', "स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो' अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रा. एन. आय. खोत म्हणाले, "शेतकरी हितासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दर जाहीर होईपर्यंत कारखान्यांना ऊस देऊ नये. सीमाभागातील सर्व कारखान्यांनी पहिली उचल विनाकपात 3400 रुपये देण्याची संघटनेची मागणी आहे. मागणीकडे दुर्लक्ष करून तोडण्या सुरुच ठेवल्यास होणाऱ्या नुकसानीला तोड देणारे शेतकरी जबाबदार राहतील.' 

सुभाष चौगुले म्हणाले, "दर निश्‍चित होईपर्यंत बैलगाडी, ट्रॅक्‍टर, ट्रक अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी ऊसाने भरून वाहन रस्त्यावर आणू नये. ऊस भरल्यास होणाऱ्या वाहनांची जबाबदारी वाहनधारकांची असेल.' संजय पाटील म्हणाले, "मांगूरमध्ये चिक्कोडी कारखान्याचा तुटलेला ऊस संघटनेने वाळत टाकला असून कारखाने जोपर्यंत दर जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी संघटनेला सहकार्य करावे.' 

रमेश पाटील, तात्यासाहेब केस्ते यांनीही खासदार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. वाहनाच्या चाकातील हवा सोडल्यावर पुढे संताजी घोरपडे (काळम्मा बेलेवाडी) कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी कार्यकर्ते रवाना झाले. यावेळी विकास समगे, पिंटू पाश्‍चापुरे, मलगोंड तावदारे, शीतल पाटील, बाबासाहेब पाटील, प्रा. सचिन खोत, अमोल पाटील, नरेश सवदी, राजगोंड पाटील, महावीर पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

मांगुरातही ऊसतोड रोखली  मांगूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेटनेने जयसिंगपूर येथील ऊस परिषदेनंतर उसाचा दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या कांडीला हात लावू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानुसार येथील कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. 29) सर्व शेतकऱ्यांना ऊसतोडी बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. रविवारी रात्री सांगावहून संताजी घोरपडे साखर कारखान्याला जाणारा उसाचा ट्रॅक्‍टर अडविला. शिवाय सोमवारी (ता. 30) हालसिद्धनाथ साखर कारखान्याकडे जाणारा उसाचा ट्रॅक्‍टरही "स्वाभिमानी"च्या कार्यकर्त्यांनी अडविला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com