सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा माफ करण्याचे विचाराधीन : उर्जामंत्री बावनकुळे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत लाभार्थ्याला १० टक्के, तर मागासवर्गीय व आदिवासी लाभार्थ्याला ५ टक्के रक्कम भरावी लागते. ही रक्कम माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात जावे लागणार असून, त्यानंतर शासन या मागणीवर योग्य विचार करू शकते, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी हा प्रश्न विचारला होता. या योजनेसाठी लागणारे अर्ज ऑनलाइन भरावे लागतात. गरीब शेतकरी फॉर्म भरू शकत नाही. राज्यात दुष्काळ आहे, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांचा हिस्सा माफ करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, की अडीच लाखांचा पंप शेतकऱ्यांना १० टक्के व ५ टक्के हिस्सा घेऊन नि:शुल्क देण्यात येत आहेत. संपूर्ण रक्कम माफ करणे सयुक्तिक नाही. त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल.

भाजपचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले, की ३ व ४ अश्वशक्तीचे पंप वापरणारे शेतकरी कमी आहेत. त्यामुळे ७ व १० अश्वशक्तीचे पंप देण्याचा निर्णय घेणार का, यावर ऊर्जामंत्र्यांनी सांगितले, की ३ व ५ अश्वशक्तीसाठी सौर कृषिपंप देण्याचा निर्णय झाला असून, ७ व १० अश्वशक्तीसाठी पारंपरिक वीजजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चदाब वीज वितरण प्रणाली या योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला एक ट्रान्सफॉर्मर देण्यात येणार आहे. ज्यांना सौरऊर्जेची जोडणी हवी त्यांना ती देण्यात येईल, तर ज्यांना पारंपरिक वीजजोडणी पाहिजे त्यांना तशी जोडणी मिळणार आहे, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना १० तास वीज देण्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांची एक समिती नेमण्यात आली आहे. त्या-त्या जिल्ह्याची स्थिती पाहून ही समिती निर्णय घेते, समितीने शिफारस केल्यास संबंधित भागाला १० तास वीज देता येते, असे एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. एचव्हीडीएस योजनेस मिळणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची मागणी जास्त आहे, पण पुरवठा कमी असल्याने जोडणीला वेळ लागत आहे. असे असले तरी पैसे भरून प्रलंबित असलेल्या वीजजोडण्या डिसेंबर ते मार्च २०२० याकाळात पूर्ण केल्या जातील, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.

सौर कृषिपंपाच्या जोडणीसाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा अहवाल आवश्यक आहे. कारण ७० ते १०० मीटर अंतरावर पाणी असेल तिथेच ही जोडणी देता येते, असे सांगताना ऊर्जामंत्री म्हणाले, की कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातून सौर कृषिपंपासाठी नवीन अर्जच येत नाहीत, पैसे भरून प्रलंबित असलेले ६०७ शेतकऱ्यांना जोडणी लवकरच देण्यात येईल. या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे उपाध्यक्षांनी या प्रश्नावर आपल्या दालनात बैठक घेऊ व सर्वांचे समाधान करू, असे आश्वासन सभागृहात दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com