यवतमाळ : कृषी क्षेत्रासमोर आव्हानांचे अनेक कांगोरे आहेत. त्यामध्ये वातावरणातील बदल हा प्रभावी असल्याने त्या संदर्भातील संशोधनावर भर देण्याची गरज अाहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बुधवारी (ता. २०) बोलत होते. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कुलगुरू डॉ. विलास भाले, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पालकमंत्री मदन येरावार, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांची या वेळी उपस्थिती होती.
या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, की दुष्काळ, समुद्र पातळीत अचानक वाढ, तर कधी पूर परिस्थिती अशी विचित्र स्थिती वातावरणातील बदलामुळे अनुभवली जात आहे. वातावरणातील बदल हे शेती क्षेत्रासमोरील मोठे आव्हान त्यामुळे ठरत आहे. परिणामी वातावरणातील बदलानुरूप तग धरणारे वाण आणि इतर निविष्ठांचे पर्याय उपलब्ध होणे काळाची गरज आहे. त्याकरिता कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.
शेती क्षेत्रासमोरील आव्हानांमध्ये सुरवातीला दर्जेदार कृषी निविष्ठा आणि त्यानंतर शेतमालाची विक्री आणि त्याला भाव या आव्हानांचादेखील समावेश आहे; मात्र अशावेळी राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन गंभीर असून, अनेक उपाययोजना या क्षेत्राच्या विकासासाठी राबवत आहे, ही नक्कीच समाधानाची बाब आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रत्येक थेंबामधून अधिक पीक’ हा नारा दिला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचे २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्यासाठीदेखील त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात नजीकच्या काळात कीड आणि त्यासोबतच कीडनाशकाच्या माध्यमातून मोठे प्रश्न निर्माण झाले. काही शेतकरी, शेतमजुरांना यामुळे जीवही गमवावा लागला. जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशाप्रकारच्या समस्यांचे समाधान मिळावे, अशी अपेक्षा या वेळी बोलताना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.