अकोला : पेरणीनंतर पावसाने मारलेली दडी अाणि पीक काढणीला अाल्यानंतर अालेल्या पावसामुळे वऱ्हाडात या हंगामात उडदाचे मोठे नुकसान झाले अाहे. अनेक शेतकऱ्यांना लागवड खर्चसुद्धा निघण्याची शक्यता दिसत नाही.
सध्या उडीद काढणीचा हंगाम सुरू झालेला अाहे. उडदाची सोंगणी सुरू अाहे. सोंगणीसाठी १३०० ते १५०० रुपये एकर मजुरी घेतली जात अाहे. त्यानंतर मळणीसाठी थ्रेशरचालकांकडून ५०० ते ६०० रुपये दर अाकारण्यात येत अाहे. बहुतांश शेतकऱ्यांना एकरी एक क्विंटलचीही उत्पादकता मिळालेली नाही.
वास्तविक या हंगामात शेतकऱ्यांचा सोयाबीनचे क्षेत्र कमी करून उडदाच्या लागवडीकडे कल होता. चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा होती. परंतु अाता हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे समोर येऊ लागले अाहे. या हंगामात जून महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. उडदाचे पीक चांगल्याप्रकारे उगवलेही होते. दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम झाला. प्रामुख्याने फूल धारणेच्या काळात पिकाला ताण बसला. त्यामुळे शेंगांची संख्या कमी झाली. ज्या शेंगा परिपक्व झाल्या त्यापासून खर्च निघेल असे शेतकऱ्यांना वाटत होते.
परंतु नेमका गणेशोत्सवाच्या काळात पाऊस झाला. या वेळी उडदाची बऱ्याच प्रमाणात सोंगणी झालेली होती. हा उडीद अोला झाल्याने त्यावर बुरशी आली. काही शेतात जागेवरच कोंब फुटले तर काही शेतांमधील उडदाचा रंग बदलला. यामुळे अाता व्यापारीसुद्धा खरेदी करताना दर पाडून घेतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत अाहेत.