नागपूर : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा काढण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करण्यात आली असून, नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बोंड अळीसंदर्भातील मदत आठ-पंधरा दिवसांत देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
बीटी कापसावर मागील खरीप हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच तापला. त्यानंतर शासनाने मदत देण्याचे जाहीर केले होते. कृषी व महसूल यंत्रणेकडून संयुक्त सर्वेक्षणही करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील आठ तालुक्यात १ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या ६९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र यात नागपूर जिल्ह्यातील मौदा, काटोल, नरखेड, रामटेक आणि कळमेश्वर या पाच तालुक्यात नुकसान झाले नसल्याचे अहवाल देण्यात आला आहे.
यावरून चांगलाच वादंग निर्माण झाला होता. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खरीप हंगामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बीटी कापसासंदर्भात यंदा ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. बोंड अळीसंदर्भातील मदतीच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. यानुसार वगळण्यात आलेल्या सर्व जिल्ह्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निधी देण्यास उशिर झाला. मात्र लवकरात लवकर तो शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.