नगरमध्ये बोंड अळीची नुकसानभरपाई ‘निकषा`च्या कचाट्यात

बोंडअळी
बोंडअळी
नगर ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापसाच्या क्षेत्राचे प्रशासनाने पंचनामे केले. मात्र, मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा यंदाचे उत्पादन कमी असले तरच शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरतील अशी अट आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पंचनामे करून ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अहवाल असला तरी मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा यंदाचे सरासरी उत्पादन जास्त आहे. त्यामुळे कापसाचे बोंड अळीने मोठे नुकसान झाले असले तरी निकषामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
 
नगरसह राज्यातील बहुतांश भागात अशीच स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात कापसाचे सरासरी साठ हजार हेक्‍टर क्षेत्र होते. मात्र, अलीकडच्या काळात लागवड क्षेत्रात वाढ होत सरासरी क्षेत्र एक लाख हेक्‍टरपर्यंत पोचले आहे. यंदा एक लाख पंचवीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने लागवड क्षेत्र वाढले असले, तरी नंतरच्या काळात पावसाने दिलेला ताण आणि सरतेशेवटी झालेला जोराचा पाऊस यामुळे नुकसान झाले. त्यात पुन्हा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे साधारण ६० ते ७० टक्के नुकसान झाले.
 
जिल्हा प्रशासनाने बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले. प्रशासनाच्या अहवालानुसार १३८६ गावांतील एक लाख ९७ हजार ३४२ शेतकऱ्यांच्या एक लाख ४२ हजार ७३५ हेक्‍टर क्षेत्रावरील कापसाचे बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी साधारण १५७ कोटी २३ लाख १४ हजार रुपयांची गरज आहे. मात्र सरकारची पाच वर्षांची अट राज्यातील कापूस उत्पादकांसाठी अडचणीची ठरत आहे.
 
बोंड अळीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना २०१२ ते २०१६ या पाच वर्षांतील कापसाच्या उत्पादनाची सरासरी काढली जात आहे. ती सरासरी यंदाच्या उत्पादनापेक्षा जास्त असली तरच नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित शेतकरी पात्र होणार आहेत. जिल्ह्यामधील ९७ महसूल मंडळापैकी ६२ मंडळात कापसाचे पीक घेतले आहे. मात्र पाच वर्षांच्या सरासरी उत्पादन निकषानुसार कोपरगावमधील पाच व जामखेडमधील दोन अशा अवघ्या सात महसूल मंडळातच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
मागील पाच वर्षांची उत्पादनाची सरासरी काढताना त्यातील २०१२, २०१४ व २०१५ या तीन वर्षी दुष्काळ होता. त्या वर्षी हेक्‍टरी दोन िंक्वंटल उत्पादन निघाले होते असा कृषी विभागाचा अहवाल आहे. त्यामुळे या निकषानुसार नुकसानभरपाई दिली गेली तर जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. पाच वर्षांपैकी तीन वर्ष दुष्काळ होता असे कृषी विभागानेही वरिष्ठांना कळवले आहे. 
 
बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) : नगर ः ३४४५, पारनेर ः १५७, पाथर्डी ः ३६१३१, संगमनेर ः १०३५.५४ , कोपरगाव ः ४६४९.१४, राहाता ः९२९.७४, श्रीरामपूर ः ४३२१.२०, नेवासे ः २१९०६, राहुरी ः १०२२२, शेवगाव ः ४७१९२, कर्जत ः ६३३६, श्रीगोंदे ः २८०६.३२, जामखेड ः ३६०२.४१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com