बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळा

बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळा
बीटी बियाणे भरपूर; पण धुळपेरणी टाळा

पुणे : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळण्यासाठी शासन दक्षता घेत आहे. तथापि, गुलाबी बोंड अळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची धुळपेरणी टाळावी, असा आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी बीटी कापूस बियाण्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला असून, दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेसे मिळण्याबाबत सूचना दिल्या आहेत. "बीटी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची मागणी १६० लाख पाकिटांची गृहीत धरण्यात आली आहे. मात्र, उपलब्धता १९० लाख पाकिटांपर्यंत राहील, असे आमच्या यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परराज्यातील किंवा शंकास्पद बियाणे अजिबात विकत घेऊ नये़, तसेच धुळपेरणी टाळावी. यामुळे गुलाबी बोंड अळीच्या विरोधातील मोहीम प्रभावीपणे राबविता येईल," असे कृषी आयुक्तांनी सांगितले.  "बीटी बियाणे यंदा कमी मिळेल किंवा गेल्या हंगामात बोंड अळी वाढल्यामुळे यंदा बियाण्याला दर्जा नसेल, अशा अफवांवर शेतकऱ्यांनी अजिबात विश्वास ठेवू नये. शंकास्पद बियाणे लक्षात येताच त्वरित कृषी विभागाला कळवावे. यामुळे बोगस बियाण्यांची विक्री रोखून चांगल्या बियाण्यांची बाजारातील उपलब्धता वाढविण्याच्या कृषी विभागाचा हेतू यशस्वी होईल," असे कृषी विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. शासनाची मान्यता नसलेले बीटी बियाणे परराज्यांतून शेतकऱ्यांपर्यंत येण्याची शक्यता कृषी विभागाने गृहीत धरलेली आहे. गेल्या हंगामात सहा लाखांहून अधिक एचटी (हर्बिसाईड टॉलरन्ट) कपाशी बियाणे राज्यात आले होते. या बियाण्याला केंद्र शासनाने मान्यता दिलेली नाही. तथापि, शेतकऱ्यांना या बियाण्यांची विक्री कोणी केली, याचा तपास लावण्यासाठी राज्य शासनाने आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांची एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन केली आहे. गुलाबी बोंड अळीचा समूळ नायनाट झालेला नाही. त्यामुळे धुळपेरणी केल्यानंतर पावसाचा ताण बसल्यास नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी यंदा कपाशीची धुळपेरणी टाळण्याची गरज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा या भागात धुळपेरणी होते. त्यामुळे आम्ही स्थानिक कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी सूचना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. बोंड अळीचे संकट कायम असल्याने सल्ला पाळावा  गेल्या हंगामात कपाशीचे पीक शेतात उभे असतानाच गुलाबी बोंड अळी वाढण्याचे संकेत मिळाले होते. त्यामुळे फरदळ (कपाशीचे दुहेरी किंवा तिहेरी पीक घेण्याची पद्धत) पीक न घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. मात्र, अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी नेहमीसारखेच फरदळ पीक घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी उत्पादनात ५० ते ८० टक्क्यांपर्यंत घट आली होती. गुलाबी बोंड अळीचे संकट यंदाही कायम आहे. त्यामुळे कृषी विभागाचा धुळपेरणी न करण्याचा दिलेला सल्ला ऐकावा, अन्यथा धुळपेरणी करणारी गावे अडचणीत येऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com