ऑनलाइन अन् निकषांच्या फेऱ्यात शेतमाल खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद :  शेतमालाची हमीभावाने खरेदी ऑनलाइन नोंदणी करून केली जाणार असली, तरी या प्रक्रियेला अजून तरी फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही. नोंदणीसाठी केंद्र सुरू असले, तरी त्यांच्याकडे नोंदी करण्यासाठी शेतकरी वळले नाही. जे वळले त्यांना निकषांमुळे हमीभावाने विक्री करता आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकूणच ऑनलाइन प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळाली का, हा प्रश्न आहे.

राज्य शासनाने शेतमालाचे पडलेले दर पाहता आधारभूत किमतीनुसार शेतमालाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी यंदाच्या खरिपापासून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकपेऱ्यासह सातबारा, आधार कार्ड व इतर आवश्‍यक कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी करण्याचे धोरण अमलात आणले. त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी औरंगाबाद, लासूर स्टेशन, वैजापूर या तीन केंद्रांवर शेतकऱ्यांची हमीभावाने शेतमाल विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली.

जालना जिल्ह्यातील अंबड, बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्‍यांसह उस्ममानाबाद जिल्ह्यातील सात केंद्रांवर शेतमाल हमीभावाने विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली. प्रत्यक्षात या नोंदणीसाठी आजवर औरंगाबाद जिल्ह्यात मोजक्‍याच शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. उडीद, मूग व सोयाबीनचा पेरा औरंगाबाद जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असल्याने तीनही केंद्रांवर खरेदी सुरू होऊनही या केंद्रावर उडीद, मूग इतर शेतमालाची दखलपात्र खरेदी झाली नसल्याची चित्र आहे.

जालना जिल्ह्यात नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन, मूग, उडीद खरेदीचा तिढा गुरुवारी (ता. २६) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुटला. जालना जिल्ह्यात अंबड येथे शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांच्या ऑनलाइन सातबारावर यंदाचा पीकपेरा नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावाने मालाची विक्री करण्यासाठी नोंदणी करता आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंबड येथे केवळ एका शेतकऱ्याची ऑनलाइन शेतमाल विक्रीसाठी नोंद झाली असून, जालना येथील नोंदणी व खरेदी केंद्र शुक्रवारी (ता. २७) सायंकाळपर्यंत सुरू होणे अपेक्षित होते. जाफ्राबाद व भोकरदन येथे खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी नाफेडकडे प्रस्ताव देण्यात आला असून, त्याला मंजुरी येणे बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीड जिल्ह्यात अकरा केंद्रांवरून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली. २६ ऑक्‍टोबरपर्यंत जवळपास १४५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा कडा ही पाच खरेदी केंद्रेही सुरू करण्यात आली. परंतु एफएक्‍यू प्रतीच्या निकषात बसणारा शेतमाल विक्रीस न आल्याने अजून खरेदी सुरू झाली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी सांगितले.

शुक्रवारी जिल्ह्यातील वडवणी, धारूर, परळी व केज येथील खरेदी केंद्रे सुरू करता येतील का, याची चाचपणी सुरू होती. उस्मानाबाद जिल्ह्यात सात केंद्रांवरून शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदीची प्रक्रिया सुरू होती. ऑनलाइन प्रक्रियेनुसार दरदिवशी निकषाच्या अाधीन राहून ५० ते ६० क्‍विंटलच मालाची खरेदी होत असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com