'महावितरणने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बागायती पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना महावितरणने कृषिपंपांच्या वीज देयकांची सक्तीने वसुली सुरू केली आहे; परंतु वीज देयकांची थकबाकी भरण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे महावितरणने सोयाबीनची हमीभावाने खरेदी करून वीज देयकांची थकबाकी भरून घ्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये ७० हजार ७०१ कृषिपंपधारक असून, त्यांच्याकडे ५१४ कोटी २ लाख रुपये वीज देयक थकबाकी आहे. कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील गहू, हरभराच्या पेरणीसाठी रान ओलविता येत नसल्यामुळे पेरणी रखडली आहे. तसेच हळद, केळी, ऊस, कापूस आदी पिकांना पाणी देता येत नाही.

दुसरीकडे आधारभूत किंमत खरेदी केंद्रांवर सोयाबीनचे आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा जास्त येत असल्यामुळे अद्याप सोयाबीनची खरेदी सुरू झाली नाही. या परिस्थितीत महावितरणने कृषी पंपाच्या वीज देयकांची वसुली सुरू केली आहे.

पिकांच्या सिंचनासाठी अडथळा येऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांची वीज देयके भरण्याची इच्छा आहे; परंतु त्यांच्याकडे देयक अदा करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे महावितरण कंपनीनेच सोयाबीनची हमीदराने खरेदी करून वीज देयकांची थकबाकी भरून घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यासाठी सोमावारी (ता. ३०) हिंगोली येथील महावितरणच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पोत्यासह मोर्चा काढला होता. तर विविध पक्ष संघटनांनी शासनाच्या धोरणांचा निषेध केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com