परभणी : निवळी खुर्द (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पातून कालव्यामध्ये पाणी सोडण्याचा दरवाजा नादुरुस्त आहे, परिणामी कालव्यामध्ये सतत पाणी साचून राहात आहे. अस्तरीकरणाअभावी कालव्यातून पाणी झिरपत आहे. यामुळे निवळी खुर्द ते निवळी बुद्रुक या दोन गावांदरम्यानची शेकडो एकर जमीन चिबड (क्षारपड) झाली आहे. निधी मंजूर असूनही अस्तरीकरणाचे काम पूर्ण केले जात नाही. दोन गावांमधील जमिनीचा पट्टा पडीक झाला आहे. चिबड आणि पडीक जमिनीमुळे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडत आहे.
करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयातून सिंचनासाठी २४ किलोमीटर लांबीचा एकमेव कालवा काढण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात निवळी खुर्द, निवळी बु., गौरवाडी, मंगरूळ, वर्णा, बोरी, मुडा, करवली, कसर, डोहरा या दहा गावांच्या शिवारातील २८६९ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. परंतु कालवा, चाऱ्यांमध्ये झाडेझुडपे वाढल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत.
कालवा तसेच चाऱ्या, वितरिका फुटल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही.
विशेष म्हणजे जलाशयातून कालव्यात पाणी सोडण्याचा दरवाजा नादुरुस्त आहे, त्यामुळे पाणी आवर्तन बंद केले तरी दरवाजातून काही प्रमाणात पाणी वाहत राहते. हे पाणी कालव्यामध्ये दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत साचून राहात आहे. कालवा उंचीवर आहे, त्यास अस्तरीकरण नाही, त्यामुळे खालच्या बाजूच्या जमिनीमध्ये पाणी झिरपत राहते. सतत पाणी साचून राहात असल्यामुळे निवळी खुर्द ते निवळी बु. या दोन गावांच्या दरम्यानची ३०० ते ४०० एकर जमीन क्षारपड (चिबड) झाली आहे.
या जमिनीवर शेतकऱ्यांना मशागतदेखील व्यवस्थित करता येत नाही. पिकांपेक्षा तणाची वाढ जास्त होते. निवळी खुर्द शिवारातील धरणाच्या पायथ्यापासून ते निवळी बु. शिवारापर्यंत सुमारे ३० मीटर ते २ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यातील जमीन पाणथळ पडीक झाली आहे. कालव्याच्या ० ते २ किलोमीटर अस्तरीकरणासाठी ५२ लाख २२ रुपये निधी मंजूर आहे. या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही अस्तरीकरणाच्या कामाकडे जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष केले
जात आहे.