जळगाव जिल्ह्यात केळी वाहतूक दरात वाढ

केळीची वाहतूक ही शेतकरी, व्यापारी व मजूर यांच्यातील समन्वयाने व्हावी. सरबोजाची पद्धत वॅगनद्वारे केळी वाहतूक सुरू होती तेव्हा लागू होती; पण आता ट्रकमधून पंजाब, दिल्लीपर्यंत केळी जाते. त्यामुळे सरबोजा ही पद्धत नाही. - आर. टी. पाटील, अध्यक्ष, रावेर फळ बागायतदार युनियन
केळी वाहतुक
केळी वाहतुक

जळगाव ः जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर भागात शेतातून बांधानजीक असलेल्या ट्रकपर्यंत डोक्‍यावरून केळी वाहतुकीसंबंधी प्रतिजोडी (दोन घड) सरसकट आठ रुपये वाहतूक दर लागू झाले आहेत. यंदा प्रतिजोडी दोन रुपये दरवाढ झाली असून, मागील पाच वर्षांत जोडीमागे तीन रुपये वाढल्याने केळी उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढतोय; पण उत्पादन व उत्पन्न मात्र तेवढेच किंबहुना पूर्वीपेक्षा कमीच होत असल्याचे चित्र आहे.  शेतातून बांधावरील ट्रकपर्यंत केळी घड नेण्यासाठी सरबोजाही शेतकऱ्यांना देय असतो; परंतु अनेक केळी खरेदीदार संस्था किंवा व्यापारी हा सरबोजाही शेतकऱ्यांना देत नसल्याचे चित्र आहे. केळी उत्पादकांची पिळवणूक सुरूच असून, हा प्रश्‍न यंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०१३-१४ मध्ये केळीची बांधापर्यंत वाहतुकीची मजुरी किंवा दर प्रतिजोडी पाच रुपये एवढी होती; परंतु आता सरसकट आठ रुपये प्रतिजोडी, असे दर आकारले जात आहेत.  ३०० पेक्षा कमी घड असले, तर आठ रुपये प्रतिजोडी, असे दर आहेत. ३०० घड असले, तर सहा रुपये प्रतिजोडी, असे दर आहेत. यातच एखाद्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत किंवा बांधावरील ट्रकपर्यंत घड नेताना चढउताराचा रस्ता असला तर मजूर वाहतुकीस नकार देतात आणि अनेकदा जादा दराची मागणी करतात.  केळी वाहतुकीनंतर मजुरी केळी खरेदीदार मजुरांना रोखीने देतात. नंतर खरेदीदार केळी उत्पादकाला देय असलेल्या पैशांमधून केळी वाहतुकीचे मजुरांना दिलेले पैसे वजा करून केळी उत्पादकाला चुकारा देतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com