‘त्या’ शेतकऱ्यांचे मृत्यू विषबाधेमुळेच

‘त्या’ शेतकऱ्यांचे मृत्यू विषबाधेमुळेच
‘त्या’ शेतकऱ्यांचे मृत्यू विषबाधेमुळेच

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू हे विषबाधेमुळेच झाले आहेत, असे ‘एसआयटी’ (विशेष तपासणी पथक)कडून कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपविण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. ३०) हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला. यामुळे मद्य, तंबाखू आणि व्यसनाधीनता ही शेतकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत होती, अशा प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करतेवेळी ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. यामधील २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर ४५० पेक्षा अधिक बाधितांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर अकोला, अमरावती, नागपूर व राज्याच्या इतर भागांतदेखील अशा प्रकारच्या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. या संपूर्ण शेतकरी मृत्यूच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून अमरावती विभागीय आयुक्‍त पीयूष सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचादेखील या समितीत समावेश होता. या समितीने आपला ३० नोव्हेंबरला प्रधान कृषी सचिव बिजयकुमार यांच्याकडे सादर केला. यामध्ये फवारणीदरम्यान विषबाधा होऊनच या शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूमागे व्यसनाधीनता असल्याच्या चर्चा आणि तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. या अहवालात काही अधिकाऱ्यांच्या चौकशीची किंवा त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली काय, या संदर्भाने बोलण्यास मात्र समितीमधील सदस्यांनी नकार दिला. परंतु हिवाळी अधिवेशन काळात काही कृषी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

तर्कवितर्कांना पुर्णविराम? ‘एसआयटी’च्या अहवालात मृत्यूमागील शास्त्रीय कारणांचा शोध घेण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या मृत्यूमागील कारणांचा यात अभ्यास करण्यात आला. अनेक प्रकारचे विष एकत्रित करून फवारणी केल्याने तीव्रता वाढली, असे सूत्र सांगतात. श्‍वासावाटे थेट फुफ्फुसात हे विष पोचले आणि थेट मेंदूवर त्याचा परिणाम होऊन मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. विषबाधेनंतर ऍट्रोपीन व पामसारखे ऍन्टीडोज देण्यात आले. यामुळे शरिरातील विषाची मात्रा निघून गेली. त्याआधारेच मृतकांच्या रक्‍तात विष नसल्याचे भ्रामक दावे करण्यात आले, असेही निरीक्षण अहवालात नोंदविल्याची माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com