साखर दराच्या समस्येबाबत केंद्रात आज चर्चा होणार

साखर दराच्या समस्येबाबत केंद्रात आज चर्चा होणार
साखर दराच्या समस्येबाबत केंद्रात आज चर्चा होणार

पुणे : बाजारपेठेत ग्राहकांसाठी साखरेचे दर टिकून असताना साखर कारखान्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या साखरेचे भाव मात्र व्यापाऱ्यांनी पाडल्यामुळे कारखाने संकटात आले आहेत. या समस्येवर आज (ता. ५) दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुभाशिष पांडा यांनी ही समस्या जाणून घेण्यासाठी देशातील साखर कारखाना प्रतिनिधींशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याशी देखील श्री. पांडा चर्चा करणार आहेत. या समस्येवर उपाय म्हणून सरकारने साखर आयातीवर बंदी घालावी, तसेच निर्यात बंदी लागू करून बफर स्टॉक धोरण मागे घेण्याचा आग्रह संघाकडून धरला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  देशाचा ऊस गाळप हंगाम सध्या वेगात असून, साखरेचा साठा मर्यादित स्वरूपाचा आहे. बाजारपेठांमध्ये साखरेचे दर 40 ते 42 रुपये किलो असल्यामुळे साखर कारखान्यांची साखर चढया दराने म्हणजेच 3600 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात होती. बाजारात सध्यादेखील साखरेचे दर टिकून असताना दुसऱ्या बाजूला कारखान्यांकडील साखर खरेदीचे दर पाडण्यात आलेले आहेत.  कारखान्यांचा साखर उत्पादन खर्च प्रतिक्विंटल तीन हजार 675 रुपये असताना सध्या व्यापारी मात्र तीन हजार रुपये दराने साखर विकत घेत आहेत. हीच साखर बाजारात पूर्वीप्रमाणेच 40 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यामुळे कारखान्यांचा मोठा तोटा होत असून, त्यातून शेतकऱ्यांना ऊस पेमेंट देताना अडचणी उभ्या राहत आहेत, अशी भूमिका साखर कारखान्यांनी घेतली आहे.  राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या म्हणण्यानुसार, साखर विक्रीत सध्या कारखान्यांना प्रतिक्विंटल 600 रुपयांचा तोटा होतो आहे. यातून उद्भविणाऱ्या समस्यांवर महराष्ट्र राज्य साखर संघ तसेच व्हीएसआयनेदेखील चर्चा केली होती. केंद्र शासनाने हस्तक्षेप न केल्यास कारखान्यांसमोरील समस्या अजून वाढतील, असेही कारखान्यांनी सूचित केले होते. 

शेतकऱ्यांचा पैसा कोणाच्या खिशात? भारतीय साखर कारखानदार संघाचे (इस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखान्यांची अडवणूक खरेदीचे दर पाडले गेले आहेत. ग्राहकांसाठी विक्रीचे किरकोळ दर कायम ठेवून कारखान्यांकडून मात्र दहा रुपये कमी दराने साखर विकत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचा हा पैसा कोणाच्या खिशात जातोय याचा शोध सरकारने घ्यावा. कारण त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे बाजारातील अनिष्ठ घडामोडींना आळा घालून कारखान्यांना किमान 35 रुपये प्रतिकिलो दर मिळण्याबाबत उपाय करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com