राज्यात कृषी पदवीसाठी ‘सीईटी’लागू

राज्यात कृषी पदवीसाठी ‘सीईटी’लागू
राज्यात कृषी पदवीसाठी ‘सीईटी’लागू

पुणे : वैद्यकीय, अभियांत्रिकीप्रमाणेच राज्यातील कृषी पदवी शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी 'सीईटी' लागू करण्यात आली आहे. शासनाने या निर्णयावर शिक्कामोर्तब करताच सीईटी घेण्याचा प्रस्ताव राज्याच्या सामाईक प्रवेश परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आला आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने पाचव्या अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार कृषी पदवी शिक्षणात काही रचनात्मक बदल केले आहेत. तसेच केंद्र शासनाने आता कृषी शिक्षणाला 'व्यावसायिक' दर्जाही दिला आहे. त्यामुळे कृषी पदवीचे प्रवेशदेखील सीईटीतून करण्याचे बंधन राज्य शासनावर आपोआप येऊन पडले होते.

"कृषी पदवीसाठी सीईटी पद्धत राबविण्याची अंतिम तयारी कृषी परिषदेने पूर्ण केली आहे. राज्य शासनाची अंतिम मान्यता घेऊन सामाईक प्रवेश परीक्षा मंडळाच्या आयुक्तांना पत्र दिले जात आहे. त्यामुळे वैद्यकीय, अभियांत्रिकीप्रमाणेच राज्यातील कृषी पदवीसाठी याच मंडळाकडून सीईटी घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कृषी सीईटीसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पेपर बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे दुसरा पेपर गणिताचा किंवा जीवशास्त्राचा दिला तरी कृषीसाठीदेखील चालणार आहे. या दोन्ही पेपरचा मिळून ७० टक्क्यांचा स्कोअर पकडला जाईल. उर्वरित ३० टक्क्यांसाठी बारावीत मिळालेली गुण गृहीत धरले जातील. याशिवाय सात बारा असल्यास १२ टक्के व कृषीचा व्होकेशनल विषय असल्यास दहा टक्के गुणदेखील गृहीत धरले जाणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना आपोआप प्राधान्य मिळणार आहे.

कृषी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, महासंचालक आर. एस. जगताप, शिक्षण संचालक हॉ. हरिहर कौसडीकर व विस्तार संचालक डॉ. विठ्ठलराव शिर्के यांच्याकडून सीईटीच्या नियोजनाचा आढावा घेतला जात आहे. प्रवेशासाठी सीईटी वगळता इतर नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

असे होणार लाभ

  • प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येऊन गुणवत्ता वाढेल
  • हुशार विद्यार्थ्यांना संधी आणि गैरप्रकारांना आळा
  • व्यावसायिक दर्जा मिळाल्याने शिष्यवृती मिळेल
  • शैक्षणिक कर्ज काढणे होणार सुलभ
  • विद्यापीठांना मानांकनासाठी उपयुक्त
  • १५ हजार २२७ जागा भरणार राज्य शासनाने सीईटी घेण्यास मंजुरी दिली असल्यामुळे आता २०१८-१९ मधील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सीईटीने होतील. राज्यातील १५६ खासगी आणि ३५ अनुदानित कृषी महाविद्यालयांमधील १५ हजार २२७ जागा सीईटीने भरण्यासाठी लागणारी तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, मत्सशास्त्र, जैवतंत्रज्ञान, पशुसंवर्धन, अन्नतंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक विज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा दहा विद्याशाखांचे प्रवेश सीईटीमार्फत होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com