‘चंद्र’पूर झाले ‘सूर्य’पूर !, देशातील उच्चांकी तापमान !!

‘चंद्र’पूर झाले ‘सूर्य’पूर !, देशातील उच्चांकी तापमान !!
‘चंद्र’पूर झाले ‘सूर्य’पूर !, देशातील उच्चांकी तापमान !!

पुणे : उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे ४६.० अंश सेल्सिअसची देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी अजून काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. तसेच मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्यावर राहून उन्हाचा चटका कायम राहील. कोकणातही उन्हाची तीव्रता ही कायम राहणार आहे.  सध्या राजस्थानपासून ते मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर लक्षद्वीप आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. येत्या मंगळवार (ता. १५)पर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे.   उन्हाचा पारा वाढत असताना गुरुवारी दुपारनंतर अचानक मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात ढग जमा झाले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कळसकरवाडी, पाटण येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. सांगली शहरातही वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी काही ठिकाणी गारांचाही पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ अशा अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडला. सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे आंबा, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला यांसह उन्हाळी पिकांचे चांगलेच नुकसान झाले. उर्वरित भागात ढगाळ व कडक ऊन पडून उकाडा वाढला होता.  मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुरोरी, जेवळी, अनाळा येथेही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. बीड, लातूर, जालना, औंरंगाबाद जिल्ह्यांत उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या होत्या. कोकणातील दक्षिणेकडे असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकली येथे सोसाट्याचा वारा सुटून पाऊस पडला. त्यामुळे काजू, आंबा या पिकांचे नुकसान झाले. उर्वरित काही भागात ढगाळ हवामान होते. रायगड, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यात आकाश निरभ्र होते.  शुक्रवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई ३४.०, सांताक्रूझ ३३.६, रत्नागिरी ३४.०, डहाणू ३५.९, पुणे ४०.८, नगर ४३.२, मालेगाव ४४.६, नाशिक ४१.१, सातारा ३९.७, सोलापूर ४२.२, औरंगाबाद ४१.५, परभणी शहर ४२.७, अकोला ४४.८, अमरावती ४३.४, बुलडाणा ४२.०, ब्रह्मपुरी ४४.७, चंद्रपूर ४६.०, गोंदिया ४३.०, नागपूर ४५.०, वर्धा ४५.०, यवतमाळ ४३.२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com