सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍वासनांचा ‘दुष्काळ’

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जिल्ह्यात सरसकट हे वास्तव असताना, त्यात दुष्काळाच्या पहिल्या यादीत केवळ नऊ तालुक्‍यांचा समावेश करत दोन तालुके वगळले आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आढाव्यासाठी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता.१७) सोलापुरात आले. पण ग्रामीण भागातील दुष्काळाच्या या गंभीर संकटाबाबत फारसे न बोलता, शहरातील विविध प्रश्‍नांसह अन्य विभागांचा आढावा घेत, संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करणे वा मदत, या सगळ्याबाबत कोणतेही ठोस आश्‍वासन न देता त्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली.  

मुख्यमंत्री फडणवीस सकाळी दहा वाजता अगदी वेळेत सोलापुरात पोचले, ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्या बैठकांच्या नियोजनानुसार तीन बैठका ते घेणार होते. पहिल्या टप्प्यात त्यांनी विविध शासकीय विभागांचा आढावा घेतला, त्यानंतर महापालिकेशी संबंधित कामांचा आढावा घेतला, त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. पण दुष्काळाच्या आढाव्याबाबत त्यांच्या नियोजनात कुठेच उल्लेख नव्हता. या कार्यक्रमानुसारच सगळ्या बैठका पार पडल्या. त्यामुळे दुष्काळ इथेही मागे पडल्याचे चित्र होते.

विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामाच्या सुरवातीपासून आतापर्यंत केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हातचा गेला आहे, पण रब्बीबाबतही आता साशंकता आहे. एवढी भीषण परिस्थिती उदभवली असताना, मुख्यमंत्री फडणवीस काहीसा दिलासा देतील, अशी भाबडी आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होती.

त्यातच गेल्या दोन आठवड्यात दोनदा ठरलेला मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला होता, बुधवारीही ते येणार की नाही, याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्या जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. अखेरीस ते आले, पण हात रिकामे ठेवूनच गेले.

बैठकांपासून लोकप्रतिनिधीही दूर मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. त्यासाठी संबंधित विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पण जिल्ह्यातील कोणत्याही आमदार, जिल्हा परिषद सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींना बैठकीचे आमंत्रण नव्हते. त्यामुळे समोर फक्त अधिकारी, विषय मांडणार कोण? हा प्रश्‍न होता. काही लोकप्रतिनिधी बैठकीसाठी म्हणून आले. पण त्यांना आमंत्रण नसल्याने बाहेरच थांबावे लागले. ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.   दुष्काळापेक्षा शहरी प्रश्‍नांवर जोर बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यात ऑक्‍टोबरअखेर दुष्काळी परिस्थितीची आणखी पाहणी होईल. दुष्काळाकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे, असे सांगत ट्रीगर दोननुसार काही तालुके त्यात समाविष्ट झाले आहेत. उर्वरित तालुक्‍याबाबत ग्राउंड रिपोर्टनुसार कार्यवाही करू, असे तांत्रिक कारण दिले. टॅंकरची सध्या गरज वाटत नाही, पण चाऱ्यासाठी वैरणविकास योजनेतून १५०० हेक्‍टरवर मका लागवडीसाठी प्रयत्न केले जातील. पाण्यासाठी विहिरी, विंधन विहिरी अधिगृहित करण्यात येतील, असे ठोकळेबाज उत्तर देत दुष्काळाच्या परिस्थितीबाबत ठोस न बोलता, आश्‍वासन न देता हा विषय आटोपता घेतला. पण शहराच्या विविध प्रश्‍नांवर मात्र अगदी दिलखुलास उत्तरे दिली. याच पत्रकार परिषदेत शहरातील उड्डाण पुलासाठी २९९ कोटींचा निधी देण्याचे, मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी ३०० कोटी देण्याचे आश्‍वासन मात्र त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com