टँकर
टँकर

जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः मुख्य सचिव

मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध मृत पाणीसाठ्याचे नियोजन करून त्याचा वापर प्राधान्याने पिण्यासाठी करावा. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या फेऱ्यांबाबत जीपीएसच्या साह्याने गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज नियंत्रण करावे, अशा सूचना मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल उपस्थित होते. मुख्य सचिवांनी टंचाईची परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले. राज्यात सध्या ४ हजार ३२९ टँकर्सद्वारे ३ हजार ३७९ गावे आणि ७ हजार ८५६ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या आढावा घेऊन मुख्य सचिव म्हणाले, की सध्या टँकर ज्या ठिकाणांवरून भरले जातात तेथे पिण्याचे पाणी किती कालावधीसाठी उपलब्ध होऊ शकेल, याचा आढावा यंत्रणेने तातडीने घ्यावा. त्याचबरोबर अन्य कुठल्या स्रोतावरून पाणी उपलब्ध होऊ शकेल याबाबतची खातरजमा उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी करावी. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर्स मंजूर आहेत, तेथे जीपीएसच्या साह्याने मंजूर फेऱ्यानुसार पाणीपुरवठा होत आहे की नाही याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी दैनंदिन माहिती घ्यावी आणि आवश्यक त्या प्रमाणात पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न करावेत. पाणीटंचाईच्या अनुषंगाने तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना व नळ योजनांची विशेष दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे, तेथे योजनांची कामे मुदतीत पूर्ण करून गावे व वाड्यांना पिण्याचे उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी, असेही मुख्य सचिवांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com