पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडद

पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडद
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडद

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा मोसमी पावसाच्या आगमनास विलंब झाला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी लांबणीवर पडली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची समस्या अधिक बिकट झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर अनेक भागांतील शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे सावट आहे. पावसाला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

यावर्षी मोसमी पावसाचे आगमन अद्याप झालेले नाही. परंतु, जून महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यामध्ये विविध भागांत पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. रविवार (ता. १६) पर्यंत नांदेड जिल्ह्यात सरासरी ८७.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात सरासरी ५.८ मिमी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सरासरी ६७.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात सरासरी २१.३ मिमी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात ८९.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५.६ मिमी पाऊस झाला. काही भागांत झालेल्या जोरदार पूर्वमोसमी पावसानंतर कापूस लागवड केली. परंतु, गेल्या आठवड्यापासून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. परंतु, बहुतांश भागात उघडीप आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे नुकसानच अधिक झाले.

गतवर्षी (२०१८) १६ जून पर्यंत या तीन जिल्ह्यात अनुक्रमे १६२.८ मिमी, ११३.५ मिमी, १५६.७ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षी जूनच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये मृग नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाल्याने नांदेड जिल्ह्यात ४८ हजार ९८९ हेक्टरवर, परभणी जिल्ह्यात ३६ हजार १९१ हेक्टरवर, हिंगोली जिल्ह्यात ९० हजारावर हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. 

नांदेड जिल्ह्यातील काही मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन नुकसान झाले होते. यंदा मात्र मोसमी पावसाच्या आगमनासोबत खरिपाच्या पेरण्यादेखील लांबणीवर पडल्या आहेत. जून अखेरपर्यंत चांगला पाऊस पडून पेरण्या पूर्ण झाल्यानंतर ठिक अन्यथा त्यानंतर पेरणी लांबत गेली तर उत्पादनात निश्चितच घट येणार आहे.

गेल्या वर्षीही आमच्या भागात खूप कमी पाऊस झाला होता. जूनअखेरपर्यंत पेरणी केली होती. यंदा पाऊस लांबल्याने एक घागर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. चाऱ्याअभावी जनावरांची विक्री सुरू आहे. - अरुण जाधव, कुडळी, ता. देगलूर, जि. नांदेड.

औंदा अजून पावसाचा पत्ता नाही. बघाड पडलेली आहे. उन्हाचे चटके सुरू आहेत. पेरणीला खूप उशीर झाला आहे. - उचितराव पोले, वडहिवरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली.

गतवर्षी ६ ते १८ जून या कालावधीत पेरणी आटोपली होती. यंदा एकच पाऊस झाला. काही शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. परंतु पेरणी कुठेच झाली नाही.  बाजीराव शेवाळे, गणपूर, ता. जिंतूर, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com