जळगाव ः जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्याचा फटका केळी पिकाला बसत आहे. शेतकऱ्यांना फवारणी करून करपा रोगाचा अटकाव करावा लागत आहे. तसेच कापणी व मळणीची कामे तातडीने आवरून घेण्यासाठी, शेतातील कणसे, हरभऱ्याचे ढीग झाकण्यासाठी रोजच धावपळ करावी लागत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
होळी व रंगपंचमी या काळात निरभ्र हवामान असले तर गहू, हरभरा, दादर यांची कापणी, मळणी वेगाने केली जाते; परंतु यंदा ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. अनेक शेतकरी गव्हाची मळणी मोठ्या मशिनद्वारे करून घेत आहेत. त्यात कापणी व गहू गोळा करण्याचे श्रम लागत नाहीत. तसेच वेळेची बचत होते.
ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, ते १६ अंश सेल्सिअस पुढे गेले आहे. कमाल तापमानही ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. मागील तीन ते चार दिवस दिवसा उकाडा व उन्हाचे चटके अधिकचे जाणवत आहेत.
निरभ्र वातावरण नसल्याने खेळती हवादेखील नाही. पूर्व ते पश्चिम असे वारे वाहत आहेत. तापमानवाढीमुळे केळी उत्पादकांना आपल्या बागांभोवती वारा अवरोधक उभारण्याचे काम सुरू करावे लागले आहे. अनेक शेतकरी हिरवी जाळी बागेभोवती लावत आहेत.