जळगाव ः जिल्ह्यासाठी १६ भरडधान्य केंद्रे मंजूर आहेत, परंतु गुरुवारपर्यंत (ता. ७) फक्त सातच केंद्रे सुरू झाली. त्यातच बाजरीची खरेदी या केंद्रांवर झालेली नाही. फक्त ज्वारी व मका खरेदी झाल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी (ता. ८) पारोळा व भडगाव केंद्रे सुरू झाली, तर शनिवारी (ता. ९) चाळीसगाव येथील भरडधान्य खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु २० नोव्हेंबरपर्यंत फक्त पाच केंद्रे सुरू झाली. त्यानंतर दोन केंद्र सुरू झाली. सद्यःस्थितीत चोपडा, भुसावळ, अमळनेर, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड व रावेर येथील भरडधान्य खरेदी केंद्र सुरू आहेत.
या सर्व केंद्रांमध्ये बाजरीची कुठलीही आवक झालेली नाही. ज्वारीची एकूण ५५८ आणि मक्याची एकूण ७३७ क्विंटल खरेदी झाली आहे. चाळीसगाव, भडगाव, पारोळा येथे भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली झाल्या; परंतु यावल, जळगाव, एरंडोल, धरणगाव आदी पाच तालुक्यांमध्ये केंद्रे सुरूच झालेले नाहीत. जिल्ह्यात बाजरीची हवी तेवढी पेरणी नव्हती. त्यामुळे बाजरीची कुठलीही आवक झालेली नसल्याचे स्पष्टीकरण मार्केटिंग फेडरेशनने दिले आहे.
जिल्ह्यात १ नोव्हेंबरपर्यंत पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे कडधान्य खरेदी केंद्र सुरू झाले. यात सोयाबीनची अल्प म्हणजेच फक्त ३०० क्विंटल खरेदी झाली आहे. तर तिन्ही केंद्रांवर उडदाची मिळून पाच हजार ७७, मुगाची २६१२ क्विंटल खरेदी झाल्याची माहिती मिळाली. कडधान्य खरेदीची मुदत संपत आली असूून, येत्या १३ डिसेंबरपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. सोयाबीनची खरेदी १३ जानेवारी २०१८ पर्यंत केली जाईल, अशी माहिती मिळाली.