तीन दिवस हुडहुडी राहणार

तीन दिवस हुडहुडी राहणार
तीन दिवस हुडहुडी राहणार

निफाड ७ अंशांवर; पुढील आठवड्यात पारा वाढणार पुणे : उत्तरेकडील काही राज्यांत थंडीची लाट आहे. वारे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवस राज्यात थंडी राहणार आहे. पुढील आठवड्यापासून थंड वाऱ्याचा प्रवाह कमी होऊन राज्यातील थंडी कमी होण्यास सुरवात होईल. त्यानंतर किमान तापमानाबरोबर, कमाल तापमानाचा पाराही हळूहळू वाढणार असून उन्हाचा चटका वाढेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

कोकणात किंचित थंडी उत्तरेकडील वारे कोकणाकडेही वाहत असल्याने येथेही थंडी वाढली आहे. मुंबई, रत्नागिरी, भिरा, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने घटले आहे. भिरामध्ये १३.९ अंश सेल्सिअसचे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. अलिबाग येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. मात्र, दोन ते तीन दिवसांनंतर कोकणातील थंडी कमी होण्याची शक्यता आहे.

निफाड ७ अंशावर मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर आहे. निफाड (जि. नाशिक) येथे ७ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद बुधवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत झाली. नाशिकमध्येही ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, सातारा येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली. कोल्हापूर, मालेगाव, सांगली येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले. पुणे, नगर येथील किमान तापमान सरासरीएवढे होते.

मराठवाड्यात थंडीत घट गेल्या आठवड्यापासून मराठवाड्यातील थंडीत चढउतार सुरू आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात थंडी वाढली आहे. मराठवाड्यातील थंडी कमी होऊन किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. बीड, परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअने कमी झाले. औरंगाबाद येथील किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढले. परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात ११.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.

विदर्भात तीव्रता कमी विदर्भातील अनेक भागांत थंडीची तीव्रता कमी झाली आहे. किमान तापमान पंधरा अंश सेल्सिपर्यंत गेले असून नागपूर, वर्धा येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत दोन अंशापर्यंत वाढले आहे. अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंश सेल्सिअसने घटले आहे. गोंदिया येथे १३.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील आठवड्यापासून विदर्भातील किमान तापमानात वाढ होणार असून उन्हाची तीव्रता हळूहळू वाढणार आहे. बुधवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) १५.४(-१), अलिबाग १७.४, रत्नागिरी १७.६ (-१), भिरा १३.९ (-१), डहाणू १५.५ (-१), पुणे ११.०, नगर १२.५, जळगाव ११.६(-१), कोल्हापूर १५.९ (१), महाबळेश्वर १२.२(-१), मालेगाव १२.४ (१), नाशिक ८.८ (-१), निफाड ७.०, सांगली १५.०(१), सातारा ११.८(-१), सोलापूर १६.३, औरंगाबाद १४.० (२), बीड १२.२ (-१), परभणी (कृषी विद्यापीठ) ११.५, परभणी शहर १३.५ (-१), नांदेड १४.५, अकोला १४.५, अमरावती १४.०(-१), बुलडाणा १५.६(१), चंद्रपूर १४.० (-१), गोंदिया १३.५, नागपूर १५.६ (२), वर्धा १५.८ (२), यवतमाळ १४.०(-२)  

‘‘उत्तरेकडील काही राज्यांत थंडी अधिक वाऱ्याचा प्रवाह उत्तरेकडून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भात गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे. पुढील आठवड्यात आणखी कमी होईल. - ए. के. श्रीवास्तव, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com