सांगली ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाले आहेत. थंडी वाढली असल्याने द्राक्षांची फुगवण थांबली आहे. द्राक्षाची गोडी कमी आहे, यामुळे याचा फटका द्राक्ष बागांना बसू लागला आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाला ५० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहेत.
जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र एक लाख एकर आहे. फळ छाटणीनंतर अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे सुमारे द्राक्ष उत्पादनात ३० टक्के घट होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार द्राक्ष उत्पादनही कमी अधिक प्रमाणात मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या मिरज, तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ या भागातील द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. द्राक्षाचे दर कमी अधिक प्रमाणात होत आहेत; मात्र दररोज वातावरण बदलत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. थंडी वाढत असल्याने द्राक्षाची अपेक्षित फुगवण होत नाही, त्यातच गोडी वाढत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये द्राक्षाची कमी अधिक प्रमाणात मागणी होते आहे.
गेल्या वर्षी वातावरण चांगले होते. द्राक्षाला दरही चांगले मिळाले. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधानी होते; मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा प्रतिकिलोस १० रुपयांनी दर कमी आहेत. त्यातच पावसाने झालेल्या नुकसानीमुळे उत्पादन घटल्याने आर्थिक ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.