मुंबई : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थानिक तसेच परराज्यांतून शेतमालाची आवक वाढली आहे. सणासुदीमुळे त्यास मागणी वाढली असून दरही वधारले आहेत. बाजार समितीत मंगळवारी (ता. २६ ) ५५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली. लसणाची १७६० क्विंटल आवक झाली. लसणाला २५०० ते ४५०० रुपये तर सरासरी ३५०० रुपये क्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीत मंगळवारी २६,४६० क्विंटल कांदा आवक झाली. कांद्याला १४०० ते १८०० रुपये तर सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. बटाट्याची १७,६०० क्विंटल आवक झाली. बटाट्यास ६०० ते १००० रुपये, तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असे दर होते. वांगी, टॉमेटो, गाजर, कोबी, फ्लॉवरचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत वधारले. मंगळवारी वाटाण्याची २७० क्विंटल आवक झाली. वाटाण्यास सरासरी ६००० रुपये क्विंटल असे दर होते, अशी माहिती व्यापारी नानासाहेब बोरकर यांनी दिली. फळ बाजारात डाळिंबाची २०,६८८ क्विंटल आवक झाली. त्यास ७६५० ते ७८५० रुपये, तर सरासरी दर ७७५० रुपये क्विंटल असा दर होता.