पुणे : गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापूस पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट आली होती. या नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेल्या भरपाईचा लाभ पुणे जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील पूर्वेकडील बारामती, दौंड, शिरूर आणि खेड तालुक्यांत काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. खरीप हंगामात जवळपास १३४ शेतकऱ्यांनी ८६.८९ हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. जिल्ह्यातील बारामती, दौंड, शिरूर व खेड तालुक्यातील कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे येथील शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.
नुकसान झालेले कपाशीचे क्षेत्र बागायती भागातील असल्याने त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे प्रतिहेक्टरी १३ हजार ५०० रुपये मिळणे अपेक्षित आहे. एकूण झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२ लाख ५ हजार ४१५ रुपये एवढी रक्कम मिळणे अपेक्षित आहे.
दौंड तालुक्यातील ६५ शेतकऱ्यांनी ३९.१४ हेक्टरवर कपाशीची पेरणी केली होती. त्यांना एकूण पाच लाख ६० हजार ७९० रुपये मिळणे अपेक्षित आहे. शिरूर तालुक्यातील ३५ शेतकऱ्यांनी २८.४६ हेक्टरवर पेरणी केली होती. त्यांना तीन लाख ८४ हजार २१० रुपये, तर बारामती तालुक्यातील ३३ शेतकऱ्यांना १८.०९ हेक्टरसाठी दोन लाख ४४ लाख २१५ रुपये आणि खेड तालुक्यातील एक शेतकऱ्यांला १.२० हेक्टरसाठी १६ हजार २०० रुपये मिळणे अपेक्षित आहे.