औरंगाबाद : मराठवाड्यात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १३० कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, तो निधी विभागस्तरावरून जिल्हास्तरावर वितरणासाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाड्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. हे संकट संपत नाही तोच ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले होते. प्राथमिक अंदाजानुसार १ लाख ९६ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर आली होती. संयुक्त पंचनाम्याअंती १ लाख ४७ हजार २०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
औरंगाबाद वगळता सातही जिल्ह्यांतील नुकसानीचा अहवाल विभागस्तरावरून शासनाला सादर करण्यात आला होता. त्यामध्ये ३३ टक्के ते ५० टक्के नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये जिरायती, बागायती व फळपिकं मिळून ७८ हजार ६२६.३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगून या नुकसानभरपाईपोटी ६७ कोटी ४४ लाख २७ हजारांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
दुसरीकडे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या ६८ हजार ५८१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी ६३ कोटी २७ लाख ४७ हजार रुपयांची नुकसानभरपाईसाठी आवश्यकता असेल असे स्पष्ट करण्यात आले होते.
मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता सात जिल्ह्यांतील ४ लाख ५२ हजार ८११ शेतकऱ्यांच्या पिकांचे गारपिटीत नुकसान झाले होते. यामध्ये ३३ टक्के ते ५० टक्क्यांदरम्यान नुकसान झालेल्या २ लाख ९४ हजार ५३३ व ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या १ लाख ५८ हजार २७८ शेतकऱ्यांचा समावेश होता. शासनाने मदत जाहीर केल्यानुसार मराठवाड्यासाठीचा निधी उपलब्ध झाला आहे.
यात सर्वाधिक ५८ कोटी ३२ लाख ५१ हजार रुपये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आले आहेत. हिंगोलीसाठी ४ कोटी ६७ लाख ४१ हजार, जालना जिल्ह्यासाठी २४ कोटी ८२ लाख ५० हजार, नांदेड जिल्ह्यासाठी १८ कोटी ६८ लाख १४ हजार, बीड जिल्ह्यासाठी ४ कोटी ७ लाख १८ हजार, लातूर जिल्ह्यासाठी १६ कोटी ४३ लाख ९३ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ३ कोटी ७० लाख ९ हजार रुपये असा १३० कोटी ७१ लाख ७८ हजार रुपयांचा हा निधी आहे. प्राप्त झालेल्या निधी पंचनाम्यानुसार वितरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.